बेळगाव लाईव्ह : चालू महिन्यात आलेल्या वाढीव वीज बिलामुळे २०० युनिट मोफत विजेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांना धक्का बसला आहे. या महिन्यात नव्या वीजदरानुसार नागरिकांना बिले मिळाली असून जवळपास ५० ते ६० टक्क्यांची लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनात आले आहे. एफपीपीसीए आणि केईआरसी ने जारी केलेल्या नव्या वीज दराच्या आदेशानुसार वीजबिलात अचानक वाढ झाल्याने नागरिकांमधून संतापजनक नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काँग्रेस पक्षाने राज्यातील जनतेला २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. काँग्रेस सरकार बहुमतात आल्यानंतर या महिन्यापासून २०० युनिट मोफत वीज मिळेल या आशेने बसलेल्या नागरिकांच्या तोंडाला गृहज्योती योजनेच्या नावाखाली तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत.
या योजनेच्या नियम आणि अटींमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असतानाच वाढीव वीजबिलामुळे हेस्कॉमसह सरकारला देखील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
चालू महिन्याच्या बिलात २.५५ रुपये प्रति युनिट ने बिल देण्यात आले असून वीजबिलात निश्चित शुल्कात देखील वाढ करण्यात आली आहे. यासह बिलामध्ये देण्यात येणारी सौर सवलत देखील रद्द करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा अधिक युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना ३ ते ५ रुपयांची प्रति युनिट वाढ करून बिल देण्यात आले आहे.
गृहज्योती अंतर्गत ज्या नागरिकांना लाभ घ्यावयाचा आहे अशा नागरिकांनी आधी या योजनेसाठी अर्ज दाखल करायचा असून जे नागरिक २०० युनिट वीज निश्चित वापरतील त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. जर २०० युनिटच्या वर वीज वापरण्यात आली असल्यास वीजबिलाचे संपूर्ण शुल्क नागरिकांना भरावयाचे आहे.