लाॅक डाऊनमुळे बेळगावमध्ये अडकून पडलेल्या राजस्थानमधील उंटांच्या तांड्यातील सहा उंटांना कर्नाटक राज्य पशु कल्याण मंडळाच्या सदस्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या पुढाकाराने तसेच सेवाभावी संघटनांच्या सहकार्याने आज शुक्रवारी खाजगी वाहनाने पुणे एपीएमसी येथे माघारी धाडण्यात आले.
राजस्थानमधून नऊ उंट घेऊन मध्यप्रदेशातील कांही तरुण लाॅक डाऊन पूर्वी बेळगाव शहरात दाखल झाले होते. लाॅक डाऊनमुळे सध्या ते बेळगावात अडकून पडले होते. हिंडाल्को नजीकच्या पुलाखाली त्यांचे वास्तव्य होते. पुरेसा चांगला चारा मिळत नसल्याने त्यांच्या उंटांची परवड होऊन कांही उंट आजारी पडले होते. आजारी उंटांपैकी एकाच्या नाकात किड पडल्याने हा माझा धर्म पशु बचाव दलाच्या सदस्यांनी काकती पशुवैद्यकीय चिकित्सा केंद्राच्या सहकार्याने त्याच्यावर तातडीने उपचार केले होते. तर आजारी उंटांपैकी अशक्तपणामुळे एका उंटाचा मृत्यू झाला होता.
पुन्हा माघारी आपल्या गावी जाण्यासाठीचा वाहतुकीचा खर्च परवडणारा नसल्यामुळे संबंधित उंट मालक उंटांसह पडल्याचे आणि त्यांच्यासह मुक्या उंटांचे हाल होत असल्याचे तसेच एका उंटाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच कर्नाटक राज्य पशु कल्याण मंडळाच्या सदस्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी प्रथम उंटांना त्यांच्या गावी परत पाठवण्यासाठी सहकार्य करावे, अशा विनंतीचे निवेदन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना सादर केले. त्यानंतर त्यांनी बेळगाव पशू बचाव संघटनेच्या (बार्क) आणि हा माझा धर्म पशु बचाव दलाच्या सहकार्याने संबंधित उंटांना त्यांच्या मालकांसह मध्य प्रदेशला पाठविण्याची व्यवस्था केली. त्यानुसार आज शुक्रवारी संबंधित उंटांना क्रेनच्या सहाय्याने ट्रकमध्ये चढवून त्यांची रवानगी प्रथम पुणे एपीएमसी येथे करण्यात आली आहे. याप्रसंगी डॉ. सोनाली सरनोबत जातीने उपस्थित होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार काल सदर उंटांचा एका राजकीय कार्यक्रमासाठी वापर करण्यात आला होता. त्यातून उंट मालकांना पैसे मिळाले होते. मात्र ते पैसे पुरेसे नव्हते, त्यांना आणखी थोड्या पैशांची गरज होती.
ती गरज बेळगाव येथील कांही दानशूर व्यक्तींनी भागवल्यामुळे आपल्या उंटांना घेऊन उंट मालकांना आपल्या गावी परत जाणे शक्य झाल्याचे समजते. सदर उंटांना उंट स्वारीसाठी अर्थात मनोरंजनासाठी वापरण्यात येत होते. या पद्धतीने मुक्या प्राण्यांचा मनोरंजनासाठी वापर करण्यावर कायद्याने बंदी आहे. खुद्द सर्वोच्च न्यायालयाने तसा आदेश काढला आहे, असे डॉ. सोनाली सरनोबत यांनी स्पष्ट केले आहे.