Saturday, April 27, 2024

/

रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ : युवा समितीने विचारला जाब

 belgaum

सध्याच्या परिस्थितीत कोरोना रुग्णांना वेळेत ऑक्सीजन व औषधे उपलब्ध करून देण्याची गरज असताना जिल्हा हॉस्पिटल अर्थात बिम्स हॉस्पिटलमध्ये बेड्स रिकामी असतानाही रुग्णाला दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्याच्या प्रकाराबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने बीम्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारून धारेवर धरल्याची घटना काल सायंकाळी घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, जिल्हा हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना दाखल करून घेतले जात नसल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, मदन बामणे आदींनी काल शुक्रवारी सायंकाळी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी हॉस्पिटल मधील कांही बेड्स रिकामी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तथापि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बेड्स रिकामी नसल्याचे सांगून वरिष्ठांशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यावेळी मदन बामणे यांनी बीस्मचे संचालक डॉ. विनय दोस्तीकोप्प यांच्याशी संपर्क साधला. तेंव्हा त्यांनी ऑक्‍सिजनचा साठा कमी असल्यामुळे नवीन रुग्णांना दाखल करून घेतले जात असल्याची माहिती दिली. तसेच आपण शहराबाहेर असल्याचे सांगितले.

त्यावेळी बामणे यांनी जर ऑक्सिजन कमी असतील किंवा बेड्स नसतील तर प्रसारमाध्यमांद्वारे तसे जाहीर का करत नाही? जनतेला का हेलपाटे घालायला लावता? असा सवाल केला. त्यावेळी डाॅ. दास्तीकोप्प यांनी आपली चूक अप्रत्यक्षरित्या मान्य करून यापुढे प्रसारमाध्यमांद्वारे जनतेला ऑक्सिजन आणि बेड्स बाबत पूर्वसूचना दिली जाईल, असे सांगितले. याप्रसंगी सचिन केळवेकर, अहमद रेशमी, गुंडू कदम आदी म. ए. युवा समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 belgaum

समिती कार्यकर्त्यांनी त्यानंतर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याशी संपर्क साधला असता आपण बाहेर गावी असून जिल्हा हॉस्पिटलमधील समस्येबाबत चर्चा करू असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान या कारभारामुळे काल सायंकाळपासून जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांना निराश होऊन माघारी परतावे लागले.

दरम्यान, कोरोना रुग्णांना वेळेत ऑक्सीजन व औषधे उपलब्ध करून देण्याची गरज असताना जिल्हा प्रशासन हात वर करत असले तर सामान्य रुग्णांनी कुठे जायचे? असा सवाल युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी केला असून असा प्रकार पुन्हा घडल्यास जोरदार आवाज उठवला जाईल, असा इशाराही महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.