आगामी लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रामलिंग खिंड गल्ली येथील कार्यालयात बोलाविण्यात आली होती. या बैठकीत लोकसभा पोटनिवडणूक आणि इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी दीपक दळवी होते.
या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समिती लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या निवडणुकीत विजयी होण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्यात येणार असून येत्या दोन ते तीन दिवसांत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार निवडीपासून ते निवडणूक रणनीतीपर्यंत कोणत्या पद्धतीने सर्वांनी कार्य करायचे आहे, यासंदर्भात कोणते निर्णय घ्यावयाचे आहेत, याविषयी तालुका समिती आणि शहर समिती एकत्रित येऊन चर्चा करण्यात येणार आहे.
पुनर्रचनेची मागणी
आज बोलाविण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित कार्यकर्ते आणि मान्यवरातून शहर समितीच्या पुनर्रचनेची मागणी करण्यात आली. कित्येक दिवसांपासून शहर समिती पुनर्रचने संदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे. यावर चर्चा करून लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
सध्या शहर आणि मध्यवर्तीच्या कार्यकारिणीवर अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार एकच असल्याने या पदावर नव्या, उमद्या नेतृत्वाला संधी देण्यात यावी, अशीही मागणी बैठकीत करण्यात आली. सीमाप्रश्नी आजतागायत समिती आणि कार्यकारिणीने उत्तमरीत्या कार्य हाताळले आहे. परंतु शहर समिती युवकांच्या हाती देऊन मध्यवर्तीच्या मार्फत मार्गदर्शन करावे, आणि मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पदवी, अशीही मागणी या बैठकीत करण्यात आली.
या बैठकीत शिवराज पाटील,प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, मदन बामणे, अरुण कानूरकर, अरुण कानूरकर, श्रीकांत कदम, संतोष कृष्णाचे, शुभम शेळके, प्रकाशबापू पाटील, रणजीत चव्हाण पाटील, रणजीत हावळांनाचे, राजेंद्र बिर्जे, राकेश पलंगे, सागर पाटील, महादेव पाटील आणि श्रीकांत मांडेकर आदींनी आपले विचार मांडले. बैठकीला समिती पदाधिकारी, मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.