बेळगावच्या रेल्वेला समृद्ध इतिहास असून जो सांगली संस्थानाशी जोडला गेलेला आहे. तुम्हाला माहित आहे का बेळगावात पहिल्यांदा रेल्वेचे आगमन म्हणजेच बेळगाव रेल्वेने जोडले गेल्याच्या घटनेला लवकरच 139 वर्षे पूर्ण होणार आहेत.
मुंबईतील (महाराष्ट्र) बोरीबंदर ते ठाणे दरम्यानच्या 34 कि. मी. अंतराच्या मार्गावर शनिवार दि. 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली रेल्वेगाडी धावली. त्याचप्रमाणे लोंढा -बेळगाव हा रेल्वे मार्ग 21 मार्च 1887 साली सुरू झाला, तर बेळगाव ते मिरज हा 138.21 कि. मी. (85.88 मैल) अंतराचा रेल्वे मार्ग डिसेंबर 1887 साली खुला झाला. सदर रेल्वेमार्ग त्याकाळी सांगली विभागात मोडत होता, जो सदर्न मराठा रेल्वेकडून हाताळला जात होता.
मिरज मार्गे पुणे ते लोंढा रेल्वे मार्गाच्या कामाला 1886 झाली सुरुवात झाली. सांगली ते बेळगाव -सांगली रेल्वे मार्ग चांदियाच्या विश्राम करमन, कुंभारियाच्या मंजिहिरा, कुंभारियाच्या जेराम जगमल यांनी पूर्ण केला.
या मार्गाला मिरज सांगली ते बेळगाव -सांगली म्हटले जायचे कारण सांगली संस्थानाचा कांही प्रदेश बेळगावनजीक होता. हा 90 मैलाचा रेल्वे मार्ग विजयनगर, उगार खुर्द, चिंचली, रायबाग, चिकोडी रोड, बागेवाडी, घटप्रभा, परकनहट्टी, पाच्छापूर आणि सुळेभावी या रेल्वे स्थानकाला जोडला गेला होता.