उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार -हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ गजाआड करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शहरासह बेळगांव जिल्ह्यातील विविध दलित संघटनांनी आज विराट मोर्चा काढला. मोर्चादरम्यान उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ आणि केंद्रातील मोदी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.
जिल्ह्यातील जय भिम टायगर्स, भीम आर्मी आदी दलित संघटनांनी उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार -हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ तसेच आरोपींना कठोर शासन व्हावे या मागणीसाठी आज भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून या भव्य मोर्चाची कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे सांगता झाली.
मोर्चादरम्यान मोदी सरकार मुर्दाबाद या घोषणेनेसह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात येत होत्या. कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून निषेध नोंदविला. या मानवी साखळीमुळे चन्नम्मा सर्कल येथील वाहतुकीस काहीकाळ अडथळा निर्माण झाला होता.
उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार -हत्या प्रकरणातील आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही याला योगी आदित्यनाथ आणि मोदी सरकार कारणीभूत असल्यामुळे त्यांनी सत्तेतून पायउतार व्हावे हाथरस येथील निंद्य घटना लक्षात घेता पंतप्रधान मोदी टीव्हीवर अच्छे दिन आले असे म्हणतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
राम जन्मभूमीतच जर सीतेचे रक्षण होत नसेल तर अशा सरकारचा काय उपयोग? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थोडीजरी मान मर्यादा असेल तर त्यांनी संबंधित आरोपींना तात्काळ गजाआड करून कडक शासन करावे. हिंदुत्वाचा हॉट बँकेसाठी वापर करू नये, अशी परखड प्रतिक्रिया दलित संघटनेच्या एका नेत्याने मोर्चानंतर प्रसारमाध्यमांसमोर बोलताना व्यक्त केली.
हाथरस घटनेचे बेळगावात पडसाद-विविध दलित व इतर संघटनांची कित्तूर राणी चन्नम्मा चौकात निदर्शन-योगीयांचा जाळला पुतळा