बेळगावची महानगरपालिका सध्या धडक कारवाया करत आहे. अतिक्रमणे, तळघरे आणि बरेच काही सध्या हटवले जातेय, जनता अस्वस्थ आहे, असंतोष वाढतोय, आपली अतिक्रमणे हटविली म्हणून हा असंतोष नाही. हा आक्रोश आहे, जनतेच्या मनातल्या कोंडमाऱ्याचा, बेळगाव महा पालिका नेमकी कुणाची? सर्वसामान्यांची की सत्ताधारिंची? हा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झालाय.
हा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे.एकीकडे आमदार, खासदार, नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींच्या अतिक्रमणांचे संरक्षण थेट सभागृहात करणारे दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि उद्योगी वर्गावर हातोडा मारत आहेत, यामुळे हा मनपा नेमकी कुणाची हा प्रश्न विचारला जाणे रास्त ठरतेय.
मतदार मत घालतात म्हणून एखादा निवडून येतो. निवडून आल्यावर पैसे, सत्ता, वर्चस्व, कमिशन, कुरघोड्या याकडे त्याचे लक्ष लागते. यासाठी आपल्या पेक्षा वरचढ लोकांशी संगनमत करतो. या संगनमताची पुढे साटी लोटी बनतात. ही साटी की लोटी तू मला सांभाळ मी तुला या एकाच समिकरणावर टिकून राहतात. आणि यातूनच या मंडळींचे काहीही केलेले चालते.
ज्याच्या मतदानावर ते निवडून आले असतात, त्या गरीब सर्व समान्यांचा वाली कोणच नसतो.यामुळे गरिबांचे झोपडे उडवले जाते तर श्रीमंतांचे अपार्टमेंट तसेच राखले जाते.आजकाल बेळगाव मनपाचे जे काही चालले आहे, त्यावरून हेच दिसून येते.
तळमजल्यांवरील कारवाई किती योग्य आणि अयोग्य असे विचार करण्याची वेळ आहे. या कारवाईला विरोध करता येत नाही कारण हा सारा अनधिकृत कारभार आहे. ज्याप्रकारे या कारभाराला मनपानेच संरक्षण दिले होते आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अचनाकची कारवाई झाली ते चुकीचे आहे.
बेसमेंट किंवा तळमजला हा पूर्णपणे पार्किंग साठीच वापरायचा हा नियम आहे. तेथे उद्योग थाटण्यास प्रथम चालना कोणी दिली याचे उत्तर मनपाचे भ्रष्ट अधिकारी आणि लोकप्रतिनिधी असेच आहे. पैसे खाऊन इतके दिवस तलमजल्यात उद्योग चालवू देणाऱ्यांवर कधी कारवाई होणार की पैसे चारून जनताच चोर हा प्रश्न आहे.
पहिल्यांदा आमदार खासदारांची आणि नगरसेवकांची अनधिकृत कामे पाडवा मग आमच्याकडे या ही सर्वसामान्य जनतेची भावना चूक नाही. कारण त्यांचा कोणच वाली नाही आणि मनपा नेमकी कुणाची हेच समजत नाही.