सध्या लग्नाचा सीझन सुरु झाला आहे. विवाह समारंभ म्हणजे दोन कुटुंबे ,दोन मने आयुष्यभर एकमेकांना साथ देण्यासाठी एकत्र येतात.विवाह सोहळ्यात मुहूर्त महत्वाचा मानला जातो.काही वर्षांपूर्वी अगदी ठरलेल्या मुहूर्तावर विवाह व्हायचा, अक्षता वधुवरांवर वेळेवर पडायच्या. वधू किंवा वराला विवाह मंडपात यायला उशीर झाला तर वडीलधारी मंडळी संबंधितांना झापुन मुहूर्तावर लग्न लागेल याची काळजी घ्यायचे. पण आज हे चित्र अगदी क्वचितच पाहायला मिळते. काही वर्षांपूर्वी लग्नाची वरात पाहण्यासाठी आणि प्रभात,बसवाणेप्पा बँडची गाणी ऐकण्यासाठी लोक रस्त्याच्या कडेला उभे राहायचे.आवडीचे गाणे असेल तर वराती बरोबर आपणही गाणे ऐकण्यासाठी जायचे.पण आज वरात येत असेल तर दुसऱ्या रस्त्याने जाणे किंवा लवकरात लवकर वरात पार करून जाणे लोक पसंद करतात.
नवरदेव मंगल कार्यालयाकडे जाताना घोड्यावर बसून किंवा कारमध्ये बसून जातो.बँड किंवा बेन्जो पथक सर्वात पुढे असते.बँड आणि बेन्जो सुरु झाला की तरुणाईच नव्हे तर आबालवृद्धाना काय होते माहित नाही पण त्यांची पाऊले थिरकू लागतात.नाच करणाऱ्यांवर चिनमुरे उडवले जातात.नाच सुरु असताना बऱ्याचदा रहदारीची कोंडी होते.कोणी तर एका बाजूने जावा म्हणून सांगायला गेला तर त्याच्या बरोबर वाद घालून गर्दी जमवून अधिकच वाहतुकीची कोंडी केली जाते. उन्हाच्या दिवसात डोक्यावर सूर्य तळपत असताना एकाच ठिकाणी थांबणे म्हणजे अंदमानची काळ्या पाण्याची शिक्षा परवडली असा विचार मनात येतो.तिकडे कार्यालयाकडे वधूकडील मंडळी मुहूर्त जवळ आला पण अजून नवरदेव येईना म्हणून डोळ्यात प्राण आणून वाट बघत असतात. बऱ्याच वेळा मुहूर्त टळून गेल्यावरच नवरदेव कार्यालयात येतो.विनाकारण वधूकडील मंडळींना मनस्ताप तर सहन करावा लागतोच पण लाखभर रु खर्चून लाडक्या लेकीचे लग्न केले पण ते मुहूर्तावर लागले नाही याची रुखरुख देखील मनाला लागून राहते.
संध्याकाळी वरात निघते कर्कश डॉल्बीच्या तालावर. कानठळ्या बसवणारा आणि हृदयाचे ठोके वाढवणारा डॉल्बीचा दणदणाट यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनाही कानावर हात ठेवून जावे लागते. हृदयाची धडधड वाढते ती वेगळीच. वाहतुकीची कोंडी होऊन अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो.जेथून वरात जात असते तेथील लोकांना देखील केव्हा ही वरात पुढे जाते असे वाटते. वरातीत तरुणाईचा उत्साह गगनात मावेनासा झालेला असतो त्यामुळे एकाच ठिकाणी थांबून नाच करणे हा एक कलमी कार्यक्रमच सुरु असतो.वरातीत बँड अगदी चुकूनच पाहायला मिळतो.डॉल्बी किती हजाराची की लाखाची यावर फुकटचा मोठेपणा मारण्याची वायफळ चर्चा होते.
विवाह समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा प्रसंग असतो.हा प्रसंग अविस्मरणीय ठरावा यासाठी प्रत्येकाने मुहूर्तावर लग्न लागेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तरुणाईने आपल्या उत्साहाला थोडा आवर घातला तर नक्कीच मुहूर्तावर विवाह होतील.वेळेचे भान पाळणार नसाल तर मग मुहूर्ताचा आग्रह धरू नका,पत्रिकेत मुहूर्त छापू नका. कार्यालयात नवरदेव पोचेल तोच मुहूर्त असे मानणार असाल तर मात्र कोणीच हरकत घेणार नाही.वरात देखील काढताना आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही,वाहतुकीची कोंडी होणार नाही,डॉल्बीमुळे लोकांची डोकेदुखी वाढणार नाही याची काळजी घेतली पुष्कळ होईल. रात्री अकरा बारा पर्यंत वरात सुरु असते.रथात बसलेले नवरा बायको सकाळपासून शुभेच्छा स्वीकारून,नमस्कार करून कंटाळलेले असतात.त्यांच्या मनःस्थितीचा देखील वरात काढणाऱ्यांनी विचार करणे आवश्यक आहे. आनंद जरूर साजरा करा पण तुमची आनंद साजरा करण्याची पद्धत इतरांना डोकेदुखी ठरू नये एव्हढीच अपेक्षा.
लेख सौजन्य-विलास अध्यापक.(ए बी पी माझा)