बेळगाव लाईव्ह :म्हादाई आणि कळसा-भांडुरा प्रकल्पांमुळे पश्चिम घाटातील जैवविविधता आणि वनसंपदेला धोका निर्माण झाला असून संपूर्ण उत्तर कर्नाटकचे रूपांतर पावसाअभावी वाळवंटात होणार असल्यामुळे या प्रकल्पासह हिडकल जलाशयाचे पाणी हुबळी-धारवाडकडे वळवण्याच्या प्रकल्पा विरोधात पर्यावरणप्रेमी संघटना आणि शहरवासीयांनी आज मंगळवारी सकाळी ‘रॅली फॉर बेळगाव’ हे भव्य जनांदोलन छेडून मोर्चाने बेळगाव जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले.
खानापूर तालुक्यासह बेळगावच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या उत्तर कर्नाटकाची जीवनवाहिनी असलेल्या म्हादाई नदीचे रक्षण करण्यासाठी आयोजित ‘रॅली फॉर बेळगाव’ या भव्य जनआंदोलनासाठी आज सकाळी शहरातील सरदार हायस्कूल मैदानावर पर्यावरणप्रेमी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांसह नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने हजर झाले होते.
याप्रसंगी प्रारंभी उपस्थित मान्यवर पर्यावरणप्रेमी व तज्ञांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी बोलताना राष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणीय कार्यकर्ता 17 वर्षीय सिद्धिमा पांडे म्हणाली की, आपल्या नद्या जंगले आणि परिसंस्था वाचवण्यासाठी अनेक वर्षापासून परिश्रम घेतले जात आहेत. त्या परिश्रमांना पाठिंबा देण्यासाठी आज मी येथे आले आहे. सर्वांनी लक्षात घ्यावे जंगला विना झाडे व पाणी नसेल तर आपले मनुष्याचे काहीही अस्तित्व नाही. आज आपल्याला या मोर्चाच्या सुरुवातीपासून समाप्तीपर्यंत जायचे नाही तर या मोर्चाचा एक भाग होऊन सर्वांनी “आपण काय बदलू शकतो? मी काय करू शकतो की ज्यामुळे आपले पर्यावरण वाचेल. मी काय करू शकतो की ज्यामुळे म्हादाई नदी वाचेल” हा विचार आपल्या सोबत घेऊन जायचा आहे.
थोडक्यात फक्त मोर्चात सहभागी न होता म्हादाई नदी पर्यायाने पर्यावरण वाचवण्याच्या पुढाकारात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. आपण कितीही पैसे कमवले कितीही मोठ्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या तरी शेवटी झाडेच आहेत जी आपल्याला जिवंत ठेवणार आहेत. तेंव्हा या मुक झाडे, नद्या यांचा आवाज आपण बनले पाहिजे असे सांगून आजचे हे जनआंदोलन बदल घडवणारे ठरावे अशी अपेक्षा पांडे हिने व्यक्त केली.
एकदा स्वामीजींनी मानव जातीच्या हितासाठी कल्याणासाठी प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी जंगलांचे जतन केले आहे. जंगलांचा ऱ्हास झाला तर वन्यप्राणी, जीव-जंतू नष्ट होतीलच शिवाय एक दिवस मनुष्य जातही लोप पावेल. त्यासाठी मनुष्याने विकासाच्या नावाखाली निसर्गाला बाधा पोहोचवणे थांबवले पाहिजे असे स्पष्ट करून म्हादाई नदीचे पाणी वळवल्यास तेथील जंगल नष्ट होणार असल्यामुळे संबंधित प्रकल्प रद्द केला जावा, असे मत व्यक्त केले. मान्यवरांनी विचार व्यक्त केल्यानंतर ‘म्हादाई वाचावा; आमचे भविष्य वाचवा’ या घोषवाक्याखाली सरदार हायस्कूल मैदानावरून कॉलेज रोड कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
हातात ‘म्हादाई वाचेली तर मलप्रभा वाचेल’, आमची म्हादाई वळवू नका तिला मुक्त वाहू द्या, आमचे पाणी आमचा हक्क.. म्हादाई वळवल्यास आमची दुर्दशा असे विविध जागृती फलक धरून घोषणा देत निघालेला पर्यावरणप्रेमी, शेतकरी आणि नागरिकांचा हा मोर्चा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता. मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सदर मोर्चाची सांगता झाली. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यातील मागण्या सरकार दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले. म्हादाई प्रकल्पासह हिडकल जलाशयाचे पाणी हुबळी-धारवाडकडे वळवण्याच्या प्रकल्पा विरोधातील आजच्या या जनआंदोलनाचे नेतृत्व दिलीप कामत, शिवाजीराव कागणीकर, कॅ. नितीन धोंड, अमृत चरंतीमठ, लिंगराज जगजंपी, सुरेश हेबळीकर, नाईला कोयलो, निता पोतदार, श्रीमती शारदा गोपाळ, सुजित मुळगुंद आदींनी केले.


