बेळगाव लाईव्ह : राकसकोप येथील जलाशय परिसरात खुलेआम पार्ट्या व मद्यपानाच्या वाढत्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेषतः संध्याकाळनंतर काही तरुणांकडून मोठ्या आवाजात संगीत, मद्यपान आणि त्यानंतर होणारे वाद-विवाद व भांडणे यामुळे परिसरातील शांतता भंग होत असल्याचे चित्र दिसत आहे.
नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा जलाशय परिसर सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी नागरिकांचे आवडते ठिकाण मानले जाते. मात्र सध्या वाढलेल्या गैरप्रकारांमुळे महिलांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मद्यधुंद अवस्थेत काहींकडून असभ्य वर्तन होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.
याबाबत ग्रामस्थांनी प्रशासन, पोलीस विभाग व लोकप्रतिनिधींकडे तक्रारी करून तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. जलाशय परिसरात पार्ट्या व मद्यपानावर संपूर्ण बंदी घालावी, नियमित पोलीस गस्त ठेवावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, ग्रामस्थ पंच कमिटीचे विलास पाटील यांनी सांगितले की, “जलाशय परिसरात दर आठवड्याला पार्ट्या होत असून रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ वाढली आहे.

काही वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. वारंवार भांडणांच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.”
परिसरातील शांतता व सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.





