बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि रिक्षा व्यवसायात शिस्त आणण्यासाठी आता प्रत्येक रिक्षाचालकाला ओळखपत्र लावणे बंधनकारक असणार आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, यामुळे अनधिकृत रिक्षा व्यवसायाला चाप बसण्याची शक्यता आहे.
बेळगाव शहरातील अधिकृत रिक्षाचालकांसाठी ओळखपत्र अनिवार्य करण्याबाबत पोलीस आयुक्त भूषण बोरासे यांच्या अध्यक्षतेखाली रिक्षाचालकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. रिक्षांमध्ये चालकाचे ओळखपत्र लावल्यास प्रवाशांना सुरक्षित वाटेल आणि चालकांनाही याचा फायदा होईल, असे मत भूषण बोरसे यांनी व्यक्त केले.
शहरात सध्या भेडसावत असलेल्या पीएनजी गॅसच्या टंचाईबाबत आणि दरवाढीबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सरकारी पंपांची संख्या कमी असून खाजगी पंप चालक चढ्या दराने गॅसची विक्री करत असल्याची तक्रार रिक्षाचालकांनी केली.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष बैठक बोलावण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
दरम्यान रिक्षाचालकांना न्याय मिळावा आणि गॅस दराच्या तक्रारींची चौकशी व्हावी, अशी मागणी रिक्षाचालकांनी केली आहे.





