बेळगाव लाईव्ह :होळी सणानिमित्त पांगुळ गल्लीतील श्री अश्वत्थामा मंदिराच्या ठिकाणी येत्या मंगळवारी होणाऱ्या कार्यक्रमात चंद्रग्रहणामुळे बदल करण्यात आला असून महत्त्वाचे म्हणजे पारंपरिक लोटांगणाचा कार्यक्रम त्यादिवशी सकाळी लवकर पूर्ण केला जाईल, असे पांगुळ गल्ली पंच कमिटी आणि श्री अश्वत्थामा युवक मंडळ यांनी कळविले आहे.
पांगुळ गल्ली पंच कमिटी आणि श्री अश्वत्थामा युवक मंडळ यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षी होळी व रंगपंचमीचा सणानिमित्त उद्या सोमवार दि. 2 मार्च 2026 रोजी रात्री ठीक 10 वाजता होळी आणण्याचा व पळवण्याचा कार्यक्रम होणार आहे.
त्यानंतर मंगळवार दि. 3 मार्च 2026 रोजी सकाळी पहाटे ठीक 5:30 वाजता होळी व होळी धनाची पूजा करण्यात येईल. तसेच इतर कार्यक्रमांपैकी चंद्रग्रहण असल्याकारणांने जाहीर लोटांगण कार्यक्रम ठिक सकाळी 8:30 ते 10:30 वाजता श्री गणपती मंदिरापासून सुरू करण्यात येईल.
देवालयाची पूजा ग्रहण सुटल्यानंतर म्हणजेच सायंकाळी 7 वाजता करण्यात येईल आणि त्यानंतर श्रीफळं वाढवण्यात येतील. तरी सर्व भक्तांनी व शहरवासीयांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पांगुळ गल्ली पंच कमिटी व कार्यकरी मंडळाने केले आहे.
दरम्यान होळीचा सण साजरा करण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाने आज रविवारी सकाळी मार्केट पोलीस ठाण्यात पांगुळ गल्ली पंच कमिटी, कार्यकरी मंडळ आणि गल्लीतील युवक मंडळांच्या अधिकारी सदस्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

बैठकीनंतर पांगुळ गल्ली पंच कमिटीतर्फे प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना सतीश परशराम अनगोळकर यांनी यांनी सांगितले की, होळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे पांगुळ गल्लीतील जागृत देवस्थान श्री अश्वत्थामा मंदिराच्या ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्याचे ठरवून वृत्तपत्रात तसे प्रसिद्ध करण्यात आले होते. तथापि चंद्रग्रहण असल्यामुळे आता त्यात बदल करण्यात आला आहे. आम्ही पांगुळ गल्लीतील पंच कमिटी व समस्त नागरिकांनी मंगळवारी होळी दिवशी सायंकाळी होणारे कार्यक्रम सकाळी घेण्याचे ठरविले आहे. त्यासंदर्भात आत्ताच आमची मार्केट पोलीस ठाण्यामध्ये पोलीस प्रशासनाशी चर्चा देखील झाली आहे.
त्या चर्चेअंती श्री अश्वत्थामा मंदिरा समोरील पारंपारिक जाहीर लोटांगणाचा कार्यक्रम मंगळवारी 3 मार्च रोजी सकाळी 8:30 ते 10:30 वाजण्याच्या कालावधीत पूर्ण केला जाईल. तसेच सायंकाळची देवालय पूजा ग्रहण संपल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. तरी भक्त मंडळींसह नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन सतीश अनगोळकर यांनी केले.





