बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील सामाजिक सेवेचा केंद्रबिंदू असलेल्या शांताई वृद्धाश्रमात आज भक्तिमय सोहळा संपन्न झाला. आश्रमाच्या विस्तारित प्रकल्पाचे भूमिपूजन आणि आराध्य दैवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आल्याने आश्रमात चैतन्याचे वातावरण पसरले होते. शांताई वृद्धाश्रमात ४ फेब्रुवारी रोजी श्री स्वामी समर्थ आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला.
या मंगल सोहळ्याची सुरुवात वामनवाडी गावातून निघालेल्या भव्य शोभायात्रेने झाली. दुपारी १२ वाजता विधिवत मंत्रोच्चारात मूर्तींची स्थापना करण्यात आली. याच कार्यक्रमात आश्रमाच्या ‘चंदन कमल’ या नवीन वास्तूचे भूमिपूजन करण्यात आले, ज्यामुळे भविष्यात अधिक ज्येष्ठांना हक्काचा आधार मिळणार आहे.
या आध्यात्मिक कार्यक्रमानंतर आयोजित महाप्रसादाचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला. सायंकाळी आजरा वारकरी मंडळाच्या कीर्तन आणि भजनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

या संपूर्ण सोहळ्याचे यजमानपद आश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे आणि शांताई परिवाराने भूषवले. आजवर १५४९ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे पवित्र कार्य आश्रमाने केले आहे.
या प्रवासात विजय पाटील आणि नागेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे विजय मोरे यांनी यावेळी नमूद केले. ज्येष्ठांच्या सेवेसोबतच सुरू असलेल्या या आध्यात्मिक कार्याचे बेळगावकरांकडून स्वागत होत आहे.





