बेळगाव लाईव्ह : जुने बेळगाव येथील शेतकरी संजय वालीशेट्टी यांच्या ऊसाच्या फडाला लागलेली आग नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळीच विझवण्यात यश आले आहे. बेळ्ळारी नाल्याला लागून असलेल्या या शेतीला लागलेल्या आगीची माहिती प्रवाशांनी तातडीने अग्निशमन दलाला दिल्याने मोठा अनर्थ टळला.
बी. एस. येडियुरप्पा मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी शेतात आग लागल्याचे पाहताच क्षणाचाही विलंब न लावता अग्निशमन दलाशी संपर्क साधला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणल्यामुळे सुमारे चार एकर ऊस वाचला असून शेतकरी संजय वालीशेट्टी यांचे होणारे मोठे आर्थिक नुकसान टळले आहे.
यंदा शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे साखर कारखाने उशिराने सुरू झाले असून, अद्याप अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतातच उभा आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून वाऱ्याचा वेगही जास्त आहे, अशा स्थितीत वाळलेला कचरा पेटवताना आग शेजारच्या शेतात पसरण्याची शक्यता असते.
शेतातील कचरा जाळताना शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत परिसरातून व्यक्त होत आहे. शेजारच्या शेतकऱ्यांनी लावलेली आग वाऱ्यामुळे ऊसाच्या फडापर्यंत पोहोचून पीक भस्मसात होऊ शकते, त्यामुळे या काळात अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.





