बेळगाव लाईव्ह :कणबर्गी औद्योगिक वसाहत ऑटोनगर (केआयएडीबी) येथे ई-आस्थी सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी कणबर्गी इंडस्ट्रियल एरिया असोसिएशन, बेळगावने महापौर आणि महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
कणबर्गी इंडस्ट्रियल एरिया असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश एम. यादव, सेक्रेटरी अशोक दानवाडे आणि उपाध्यक्ष प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी महापौर आणि मनपा आयुक्तांना सादर करण्यात आले.
बेळगाव शहरातील कणबर्गी औद्योगिक परिसर असलेल्या ऑटोनगर (केआयएडीबी) येथे सुमारे 1600 औद्योगिक आस्थापने हसण्याबरोबरच लघुउद्योजकही मोठ्या संख्येने आहेत. या सर्वांना आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी, नूतनीकरण अथवा नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी बँकांमार्फत कर्जाची आवश्यकता असते तथापि बँका ई-आस्थी असल्याखेरीज कर्ज देत नाहीत त्यामुळे उद्योग व्यवसाय वृद्धिंगत करता येत नाही किंवा नव्याने सुरू करणे अशक्य झाले आहे.
आम्हाला ई-आस्थी खाते उपलब्ध करून द्यावे यासाठी आम्ही वर्षभरापासून मागणी करत असून त्याची दखल घेतली जात नाही. दरवेळी फक्त आश्वासन देण्यापलीकडे कोणतीही कार्यवाही केली जात नाही. तरी आमच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पूर्तता करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
बेळगाव महापालिका आवारात प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना कणबर्गी इंडस्ट्रियल एरिया असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश यादव यांनी सांगितले की, बेळगाव येथील ऑटोनगर, कणबर्गी, होनगा व काकती या औद्योगिक वसाहती केआयएडीबी मार्फत झालेल्या आहेत. संपूर्ण कर्नाटकात प्रत्येक औद्योगिक वसाहतीच्या ठिकाणी ई-आस्थी सुरू झाली आहे. तथापि ऑटोनगर बेळगाव येथे मात्र अद्यापपर्यंत ई-आस्थी सुरू झालेली नाही.
त्यामुळे बँकेकडून कर्ज उपलब्ध होत नसल्यामुळे आम्हाला उद्योग व्यवसाय करणे कठीण झाले आहे. काढलेल्या कर्जाचे नूतनीकरण होत नसल्यामुळे ज्यादाचे दोन टक्के व्याज भरावे लागत आहे. यात भर म्हणून सध्या मंदी सुरू असल्यामुळे लवकरात लवकर आम्हाला ई-आस्थी उपलब्ध करून द्यावी. बेळगावमध्ये महापालिका हद्दीत नसून देखील काकती व कंग्राळी औद्योगिक वसाहतींना ई-आस्थी उपलब्ध करण्यात आली आहे.
त्याच आधारे आम्हाला देखील ती त्वरेने उपलब्ध करून द्यावी. येत्या आठवड्याभरात त्या संदर्भात कार्यवाही न झाल्यास आम्ही उग्र आंदोलन छेडू, असा इशारा अध्यक्ष यादव यांनी दिला. याप्रसंगी ऑटोनगर औद्योगिक वसाहतीतील उद्योजक व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






If you Pay corruption money to BUDA people, they will do it immediately. Now a days for getting Death certificate alos, you need to pay. All Govertment officials does’t have any humanity. Only Money speaks in Karnataka.