belgaum

..तर शहाजी महाराजांच्या समाधीचा शोधही लागला नसता : आम. मुळे

0
642
 belgaum

बेळगाव लाईव्ह :“शहाजी महाराजांचा इतिहास समजून न घेतल्याने आज त्यांची समाधीसुद्धा दुर्लक्षित आहे. पंजाबराव देशमुख यांनी पुढाकार घेतला नसता तर शहाजी महाराजांची समाधी कुठे आहे हे देखील समजले नसते,” अशी भावना कर्नाटक विधान परिषद सदस्य आणि कर्नाटक मराठा महासंघाचे नेते आमदार मारुतीराव मुळे यांनी बेळगावात व्यक्त केली.
हिवाळी अधिवेशनानिमित्त बेळगावात आलेल्या आमदार मुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शहाजी महाराजांच्या दक्षिणेतील कार्याचा उल्लेख केला.


ते म्हणाले, “छत्रपती शिवरायांचे बालपण बेंगळुरू येथे गेले. शहाजीराजांनीच बाल शिवाजींना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली. दक्षिणेत राज्यकारभार सांभाळताना त्यांनी बेंगळुरूच्या विकासाची भक्कम पायाभरणी केली.”


शिवरायांच्या प्रेरणास्थानाची उपेक्षा?
गोदेगेरी येथे जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गेलेल्या शहाजी महाराजांचा घोड्यावरून पडून मृत्यू झाला. त्या ठिकाणची समाधी एका दगडाच्या स्वरूपात होती. पंजाबराव देशमुख यांनी शोध लावत ती जागा सुरक्षित केली आणि पुरातत्त्व विभागाकडे २० गुंठे जागा हस्तांतरित झाली.
“पण महाराष्ट्रातील नेते असो किंवा मराठा समाजातील नेते — या समाधीच्या जतन आणि विकासाबाबत उदासीनता कायम दिसत आहे,” अशी खंत मुळे यांनी व्यक्त केली.

 belgaum


कर्नाटक सरकारचा पुढाकार, महाराष्ट्राची उदासीनता?
मुळे पुढे म्हणाले,
“मी वीस वर्षांपासून या स्मृतीस्थळाचा कायापालट व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे. शिवस्वराज्य गौरव स्थळाचा आराखडा तयार करून कर्नाटक सरकारला दिल्यानंतर त्यांनी निधीसुद्धा मंजूर केला आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनीही निधी दिला.”
शहाजी महाराजांच्या स्मृतीस्थळाच्या उभारणीसाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह यांच्यासह महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवार आदींची भेट घेतल्याचे ते म्हणाले.
“सर्वांनी आश्वासन दिले, पण प्रत्यक्षात काहीच घडत नाही.”


शहाजी महाराजांचा इतिहास ‘ढोल बजावण्यापुरता’ नाही
मुळे यांनी स्पष्ट केले की,
“शिवरायांच्या नावाने जयघोष केला म्हणजे आपली जबाबदारी संपली, अशी परिस्थिती महाराष्ट्रात दिसते. पण शिवरायांना घडविणाऱ्या शहाजी महाराजांच्या स्मृतीस्थळाकडे मात्र कोणीही पाहत नाही. हे मराठा समाजाचे दुर्दैव आहे.”

मराठा इतिहासाच्या संवर्धनातील ‘दक्षिणेचा विसर’
शहाजी महाराज, संभाजी राजे (शिवरायांचे थोरले बंधू) आणि छत्रपतींचा दक्षिण भारताशी असलेला दाट संबंध — हा मराठा इतिहासाचा एक महत्त्वाचा पण दुर्लक्षित भाग आहे.
बेळगाव–दक्षिण कर्नाटक पट्ट्यातील ही परंपरा जतन करण्याची जबाबदारी महाराष्ट्राने कधीच गांभीर्याने घेतली नाही, असा सूर मुळे यांच्या वक्तव्यातून उमटतो.


गोदेगेरी आणि कोप्पळ — हे दोन्ही मराठा स्मृतीस्थळे — आजही विकासाची वाट पाहत आहेत.
मराठा परंपरेच्या या दक्षिणेकडील धाग्यांकडे महाराष्ट्राच्या राजकीय नेतृत्वाने दुर्लक्ष केल्याने सांस्कृतिक वारशाचे नुकसान होत असल्याचा मुद्दा या संदर्भात प्रकर्षाने पुढे येतो.
या मुद्यावर आता पुढाकार महाराष्ट्राकडून येतो का, ही गोष्ट पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.