बेळगाव लाईव्ह :बेळगांवात होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींना कर्नाटकात असंविधानीक प्रवेशबंदी करण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र सरकारने देखील सिमाप्रश्नाचा न्यायालयीन निकाल लागेपर्यंत कर्नाटकातील मंत्री व लोक प्रतिनिधींनाही महाराष्ट्र राज्यात प्रवेशबंदी करावी, अशी मागणी कोल्हापूर युवा शिवसेना जिल्हा प्रमुख राकेश खोंद्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कोल्हापूर युवा शिवसेनेतर्फे जिल्हा प्रमुख राकेश खोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना नुकतेच सादर करण्यात आले. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी स्विकारले. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी 106 आणि महाराष्ट्र -कर्नाटक सिमाप्रश्नाच्या लढ्यात 85 जणांनी हौतात्म्य पत्करले आहे . गेली 69 वर्षे सिमाप्रश्न भिजत पडला असून गेल्या अनेक वर्षापासून कर्नाटक सरकारची सिमाभागातील मराठी भाषिकबांधवांवर भाषिक, सांस्कृतीक दडपशाही सुरू आहे.
या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती व मराठी भाषिकांच्या लढयाला पाठबळ देणाऱ्या महाराष्ट्रातील मंत्री लोकप्रतीनिधींवर कर्नाटक सरकार असंविधानीक पद्धतीने कर्नाटक राज्यात प्रवेश बंदी घातली जात आहे . कर्नाटक सरकारच्या या असंविधानीक कृतीला प्रत्युत्तर म्हणून सिमाप्रश्नाचा न्यायालयीन निकाल लागेपर्यंत कर्नाटकातील मंत्री व लोकप्रतीनीधींनाही महाराष्ट्रात प्रवेशबंदी घालण्यात यावी. महाराष्ट्र -कर्नाटक सिमाप्रश्नीच्या न्यायासाठी 2004 साली न्याय्यालयात दावा दाखल केला आहे.
त्याची सुनावणी 21 जानेवारी 2026 रोजी सुरु होत आहे. तसेच कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर 2025 पासून बेळगांव येथे सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकिकरण समितीने सिमावासियांचा महामेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मेळाव्यातून मराठी भाषिकांना त्यांच्या सिमाप्रश्ना बाबतच्या भावना मांडण्यांस आडकाठी आणू नये. मेळाव्यासाठी रीतसर परवानगीही मागितली आहे.
मात्र ही परवानगी विचारात न घेता या मेळाव्यासाठी बेळगांवात येणाऱ्या महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींना कर्नाटकात असंविधानीक प्रवेशबंदी करण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र सरकारनेही सिमाप्रश्नाचा न्याय्यालयीन निकाल लागेपर्यंत कर्नाटकातील मंत्री व लोक प्रतिनिधींनाही महाराष्ट्र राज्यात प्रवेशबंदी करावी आणि तसे कर्नाटक सरकारला कळवण्याची खबरदारी घ्यावी, असे युवा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राकेश खोंद्रे यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे. यावेळी विनोद महापूरे, मंदार गुरव, ऋषीकेश दिंडे, सिध्दार्थ वाळवेकर, दिग्वीजय निंबाळकर, भिकाजी मोहीते आदींसह युवासैनिक उपस्थित होते.




