बेळगाव लाईव्ह: शेतकऱ्यांसाठी सुगी म्हणजे वर्षभराच्या कष्टांचे फलित आणि आनंदाचा मोसम. मात्र, कडोली परिसरात गेल्या दोन–तीन दिवसांपासून हवामान ढगाळ होऊ लागल्याने आणि पावसाची चिन्हे दिसत असल्याने या आनंदावर काळी छाया येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या भाताची तत्परतेने मळणी उरकण्याची लगबग सुरू केली आहे.
साधारणपणे भात कापणीनंतर मळणी काही दिवसांनी केली जाते. परंतु अनिश्चित पावसाच्या धोक्यामुळे यावर्षी तातडीने मळणी पूर्ण करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कडोली आणि परिसरातील शेतकरी सध्या भात कापणी, मळणी तसेच कडधान्यांच्या पेरणी या तिन्ही कामांत गुंतले आहेत.
कामगारांची टंचाई, साधनसामुग्रीची मर्यादा आणि हवामानाचा बिकट अंदाज यांच्या ताणातही शेतकरी पहाटेपासून ट्रॅक्टर, बैलजोड्या आणि उपलब्ध सर्व मनुष्यबळासह मळणी उरकण्याच्या धावपळीत गुंतल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.काही शेतकऱ्यांनी भात घरात आणण्याऐवजी थेट शेतवाडीतच ठेवून मळणी जलद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या परिस्थितीत प्रत्येक थेंब पाऊस शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीला धक्का देऊ शकतो—म्हणून सुगीच्या या हंगामात कडोलीत उत्साहापेक्षा अधिक तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.




