बेळगाव लाईव्ह :कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या समाधीस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच बेळगाव विमानतळाला कित्तूर राणी चन्नम्मा विमानतळ असे नाव देण्यासाठीही केंद्राला वर्षभरापूर्वी पत्र पाठविले आहे, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.
ते शनिवारी (२५ ऑक्टोबर रोजी) कित्तूर किल्ला परिसरात झालेल्या २०१ व्या कित्तूर उत्सवाच्या समारोप समारंभात बोलत होते.कित्तूर राणी चन्नम्मा यांनी १८२४ च्या ऑक्टोबर २३ रोजी ब्रिटीशांविरुद्ध लढा देऊन विजय मिळविला होता. त्या स्मरणार्थ दरवर्षी कित्तूर उत्सव साजरा केला जातो. त्यांनी झाशीच्या राणी लक्ष्मीबाईपेक्षा आधीच ब्रिटीशांविरुद्ध लढा दिला होता. शरणागती पत्करण्याऐवजी लढाईत उतरलेल्या चन्नम्मा, संगोळी रायन्ना आणि अमतूर बाळप्पा हे स्वाभिमानाचे प्रतीक आहेत.
चन्नम्मा यांनी ठॅकरेचा वध करून ब्रिटीशांवर विजय मिळवला, हे त्यांच्या शौर्याचे शिखर आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.आपल्याच लोकांनी ब्रिटीशांना संगोळी रायन्ना यांना पकडण्यासाठी मदत केली, हे दुःखद आहे, असे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, २०१७ मध्ये आमच्या सरकारने कित्तूर चन्नम्मा जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू केली. ही जयंती राजकीय हेतूंसाठी नव्हे, तर चन्नम्मा यांच्या शौर्यगाथेचा प्रचार करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
चन्नम्मा यांचे नाव इतिहासात सदैव अमर राहील. टीपू सुलतान देखील ब्रिटीशांविरुद्ध धैर्याने लढले आणि रणांगणावर वीरगती प्राप्त केली, असे त्यांनी स्मरण केले.
समाजाला धर्म व जातीच्या आधारावर विभागले जाऊ नये, कोणत्याही धर्मात द्वेष शिकवला जात नाही. त्यामुळे माणसाने माणसावर प्रेम करायला शिकले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
वीरशैव-लिंगायत विकास महामंडळाचे अध्यक्ष व हुनगुंदचे आमदार विजयानंद काशप्पनवर म्हणाले की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वीरमाता जयंती उत्सव साजरा करण्याची २५ वर्षांची मागणी पूर्ण केली आहे. तसेच बसवण्णा यांना सांस्कृतिक नेते म्हणून घोषित करण्याचे कार्यही त्यांनी केले.
चन्नम्मा समाधीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवला गेल्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तसेच झाशीच्या राणीपेक्षा आधी ब्रिटीशांविरुद्ध लढणाऱ्या चन्नम्मा यांच्या कार्याचा अधिकृत ऐतिहासिक नोंद घ्यावी, अशी मागणी केली.
अध्यक्षस्थानी असलेले आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, देशभर चन्नम्मा यांचा इतिहास पोहोचविण्यासाठी दरवर्षी कित्तूर उत्सव साजरा केला जातो. कित्तूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पर्यटन वाढविले पाहिजे. ऐतिहासिक स्थळांच्या पुनर्बांधणीसाठी अधिक निधी मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली.
मलप्रभा साखर कारखाना अडचणीत असून शेतकऱ्यांच्या हितासाठी त्याचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सी.एम. त्यागराज यांनी सांगितले की, उत्सव फक्त औपचारिक नव्हे, तर प्रेरणादायी असायला हवेत. कित्तूर ही देशभक्तांची भूमी असून चन्नम्मा यांच्या आदर्शांचा प्रसार देशभर व्हावा. आगामी काळात अधिक अर्थपूर्णरीत्या उत्सव साजरा करून युवापिढीला प्रेरित करावे, असे त्यांनी आवाहन केले.
साहित्यिका विनया वक्कुंद यांनी म्हटले की, दोन शतकांपूर्वी कित्तूरमध्ये झालेल्या स्वातंत्र्ययुद्धाची आठवण रोमांचित करते. संविधानाबद्दल निष्ठा व्यक्त करून आपण स्वातंत्र्यसैनिकांना खरी श्रद्धांजली वाहू शकतो.
कित्तूर राजगुरू संस्थान कल्मठाचे मडिवाळ राजयोगींद्र स्वामीजी यांनी चन्नम्मा यांचा लढा हा स्वाभिमानाचा प्रतीक असल्याचे सांगून कित्तूर किल्ल्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी केली.
निच्चणकी श्रीगुरु मडिवाळेश्वर मठाचे पंचाक्षरी महास्वामीजी आणि कादरवळी सीमिमठाचे डॉ. फालाक्ष शिवयोगीश्वर यांच्यासह अनेक संत, अधिकारी आणि जनप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.




