बेळगाव लाईव्ह :बेळगावचे युवा साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांनी 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि आपले गुरू साहित्यिक विश्वास पाटील यांना बेळगाव सीमाप्रश्नावर सातारा येथे भरणाऱ्या साहित्य संमेलनात ठोस चर्चा व्हावी, अशी विनंती केली आहे.
सुप्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांची सातारा येथे भरणाऱ्या 99 वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांच्यातर्फे त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बेळगावचे युवा साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांनी त्यांची भेट घेतली.
या भेटीप्रसंगी जाधव यांनी बेळगाव सीमाप्रश्नाबद्दल थोडक्यात माहिती देऊन या प्रश्नावर सातारा येथे भरणाऱ्या साहित्य संमेलनात अध्यक्ष या नात्याने ठोस चर्चा घडवून आणावी, अशी विनंती विश्वास पाटील यांना केली. बेळगाव सीमा भागाविना संयुक्त महाराष्ट्र अधुरा आहे. बेळगाव सीमाभागातील मराठी जनतेच्या तीन पिढ्या सातत्याने महाराष्ट्रात सामील होण्यासाठी संघर्ष करत आल्या आहेत.
आता चौथी पिढी देखील संघर्ष करायला सज्ज आहे. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी शहीद झालेल्या 106 हुतात्म्यांच्या बलिदानाला सार्थ अभिमान वाटावा असे “मरेगे तो भी महाराष्ट्र में, जियेगे तो भी महाराष्ट्र में” हे सीमाभागातील मराठी जनतेचे ब्रीद वाक्य आहे.
कर्नाटक सरकारची बेळगाव सीमाभागातील मराठी जनतेवर भाषेवर दादागिरी सुरू असून अनेक समस्याशी तेथील जनता लढा देत आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संमेलनात ठोस चर्चा व्हावी, अशी विनंती अर्जुन जाधव यांनी केली.


