शहरात गेल्या शुक्रवारी संदल मिरवणुकी दरम्यान मिरवणुकीचा मार्ग बदलणाऱ्या आणि तलवारबाजी, लाठीकाठी तसेच दगडफेक करत खडक गल्ली परिसरात दहशत माजवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी. तसेच कांही संबंध नसताना ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते गुन्हे मागे घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जावी, अशी मागणी आज खडक गल्ली बेळगाव येथील रहिवाशांनी श्री युवक मंडळाच्या नेतृत्वाखाली बेळगाव शहर पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
खडक गल्ली आणि परिसरातील मोठ्या संख्येने संघटित झालेल्या स्त्री-पुरुष रहिवाशांनी श्री युवक मंडळाच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी भव्य मोर्चाने बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयावर जाऊन उपरोक्त मागणीचे निवेदन पोलीस आयुक्तांना सादर केले. शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी निवेदनाचा स्वीकार केला.
यावेळी बोलताना पोलीस आयुक्त बोरसे यांनी संदल मिरवणुकीवेळी निर्माण झालेल्या तणावाप्रसंगी हिंदू -मुस्लिम बांधवांच्या पंचमंडळींनी व युवक मंडळांनी हस्तक्षेप करून शांतता निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. तसेच निवेदनातील मागणीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून कारवाई सुरू असून कृपया नागरिकांनी सोशल मीडियावर कोणीही काहीही माहिती व्हिडिओ व्हायरल करत आहे त्यावर कृपया विश्वास ठेवू नये. पोलीस प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या प्रसिद्धी पत्रकावरच जनतेने विश्वास ठेवावा, असेच स्पष्ट केले. याप्रसंगी पोलीस उपायुक्त नारायण बरमनी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
शहर पोलीस आयुक्त बोरसे यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात पुढील आशियाचा तपशील नमूद आहे. बेळगाव शहरातील खडक गल्ली, जालगार गल्ली, भडकल गल्ली, चांदु गल्ली, चिराग नगर, घी गल्ली या परिसरात गेली 10 वर्षे शांततापूर्ण वातावरण आहे. ही शांतता टिकवण्यासाठी पोलीस प्रशासनाचे देखील सहकार्य आवश्यक आहे. तथापी गेल्या शुक्रवारी 3 ऑक्टोबर रोजी रात्री तसे घडले नाही.
त्यादिवशी काकतीवेस येथील दर्ग्याच्या उरुसानिमित्त रात्री 10 वाजता काढण्यात आलेली मिरवणूक ठरलेल्या मार्गाने न जाता मार्ग बदलून खडक गल्लीत वळवण्यात आली. या मिरवणुकीमध्ये सहभागी तरुणांकडून ‘आय लव मोहम्मद”, ‘हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा’ अशा प्रकारच्या प्रक्षोभक घोषणा देण्यात येत होत्या.
घोषणा देण्याबरोबरच तलवारबाजी, लाठीकाठी तसेच दगडफेक करण्यात आली. या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिकांकडून मिरवणूक चुकीच्या मार्गाने येत आहे असे पोलीस प्रशासनाला फोन करून कळविण्यात आले होते. तथापि संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी “आमची हद्द नाही तुम्ही दुसऱ्या अधिकाऱ्यांना फोन करा” असे बेजबाबदार उत्तर दिले. याची गांभीर्याने दखल घेऊन सदर परिसरातील शांतता कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करणे आवश्यक आहे.
संदल मिरवणुकी दरम्यान तलवारबाजी, लाठीकाठी, दगडफेक करणाऱ्यांवर, सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या देऊन वातावरण बिघडवणाऱ्यांवर तसेच प्रामुख्याने मिरवणुकीचा मार्ग बदलणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. खडक गल्ली हा परिसर हिंदूबहुल असला तरी येथे फक्त मराठा समाजाच राहत नाही, तर अनेक जाती-धर्माचे लोक शांततेने व गुन्हा गोविंदाने राहत आहेत. याची नोंद घेतली जावी.
महत्त्वाचे म्हणजे मिरवणुकीत काहीही संबंध नसताना ज्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे अशांवरचा गुन्हा मागे घेतला जावा. याउलट मिरवणुकीत प्रत्यक्ष सहभागी होऊन शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी. याव्यतिरिक्त खडक गल्ली परिसरामध्ये सुरू असलेल्या गांजा, मटका, जुगार वगैरे गैरप्रकारांना तात्काळ आळा घालावा.




