बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील माणिकवाडी येथील हॉटेलमध्ये चोरी केल्याचा आरोप असलेल्या वेेंकप्पाच्या खून प्रकरणात पोलिसांकडून तपास भरकटवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत खानापूर तालुक्यातील ग्रामस्थांनी जोरदार निदर्शने केली. त्यानंतर त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर केले.
हॉटेलमध्ये चोरी केल्याच्या आरोपाखाली वेेंकप्पाला कोंडून मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. गेल्या १६ ऑगस्ट रोजी खानापूरमधील एका हॉटेलमध्ये चोरी केली म्हणून हॉटेल मालक आणि त्याच्या भावाने त्याला एका खोलीत कोंडून बेदम मारहाण केली होती.
वेेंकप्पाचा खून होऊनही त्याला न्याय मिळवून देण्यास खानापूर पोलिस जाणूनबुजून विलंब करत आहेत, अशी तक्रार गावकऱ्यांनी केली आहे.
वेेंकप्पा हॉटेलमध्ये प्रामाणिकपणे काम करत होता. त्याच्यावर खोटा आरोप ठेवून त्याला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या त्याच्या कुटुंबाला तोच आधार होता.
आता त्यांच्या घरातील आई-वडिलांना हॉटेल मालकांकडून धमक्या मिळत आहेत. “या प्रकरणात योग्य तपास करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा,” अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.


