बेळगाव लाईव्ह : मराठी भाषिक सीमावासीयांच्या न्यायासाठी आता ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, अशी आर्त आणि ठाम मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे सीमाभागाचे उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल चरणी साकडे घालून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सीमावासीयांच्या हितासाठी एकत्र यावं, अशी मागणी केली. या मागणीसाठी पंढरपूरच्या विठुरायाचरणी मुचंडीकार यांनी वारीतून चालत जात साकडे घातले आहे.
कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांचे प्रश्न अजूनही जैसे थे आहेत. सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्न प्रलंबित असतानाही, केंद्र व राज्य सरकारांकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. या पार्श्वभूमीवर, सीमाभागातील असंतोष पुन्हा एकदा उसळताना दिसतो आहे.

मराठी अस्मितेचा प्रश्न हा केवळ राजकीय नव्हे, तर भावनिक आहे. सीमाभागातील नागरिक दशके उलटली तरी अजूनही महाराष्ट्राचा स्वीकार मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणं ही काळाची गरज आहे. राजकीय हालचालींचा विचार केला असता, गेल्या काही काळात ठाकरे बंधूंमध्ये एकमेकांविषयी सौम्य सूर उमटू लागले आहेत.
या दोन्ही प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन सीमावासीयांच्या न्यायासाठी, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी आणि केंद्रावर दबाव टाकण्यासाठी ठोस मोहीम राबवली पाहिजे, अशी मागणी सीमाभागातील नागरिकांतुन होत असून याचे प्रतिनिधित्व आज नारायण मुचंडीकर यांनी वारीच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.