belgaum

आंबोली हिल स्टेशन बनलयं मान्सूनची अद्भुत भूमी!

0
37
 belgaum

बेळगाव लाईव्ह :मान्सून हंगामाच्या पहिल्याच जोशपूर्ण मुसळधार पावसामुळे बेळगावपासून सुमारे 70 कि.मी. अंतरावर असलेले आंबोली हे निसर्गरम्य हिल स्टेशन सध्या कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि आंध्र प्रदेशसह देशाच्या इतर भागांतील पर्यटकांना आकर्षित करणारी मान्सूनची अद्भुत भूमी बनले आहे.

“धबधब्यांचा प्रांत” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली येथे पर्यटकांनी पुन्हा एकदा मोठ्या संख्येने गर्दी करायला सुरुवात केली आहे. त्यांच्याकडून आंबोली येथील धुक्याने झाकलेल्या टेकड्या, कोसळणारे धबधबे आणि हिरवळीच्या लँडस्केप्सचे मनमोहक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मान्सूनच्या पावसाने जणू या प्रदेशात नव संजीवनीच फुंकली आहे. दाट धुक्याने संपूर्ण प्रदेशाला आपल्या कवेत घेऊन त्याला एका स्वप्नासारखे आकर्षण दिल्यामुळे पर्यटकांना “परीकथेसारखा” आभास निर्माण होत आहे.

सर्वात प्रमुख आकर्षण म्हणजे बेळगाव-सावंतवाडी महामार्गालगतचा रस्त्याच्या कडेला असलेला महाकाय धबधबा, जो अद्याप पूर्णपणे पुनः प्रभारित झालेला नसला तरी, त्याच्या बहरलेल्या सौंदर्याने पर्यटकांना मंत्रमुग्ध करू लागला आहे. तेथून जवळच सुमारे 13 कि.मी. अंतरावर कावळे शेत लगतच्या जंगलाने व्यापलेल्या टेकड्यांमधून खाली वाहणाऱ्या अनेक धबधब्यांचे चित्तथरारक दृश्य पाहायला मिळते. अधूनमधून पाऊस आणि धुक्याचे वातावरण असूनही पर्यटक या परिसरात गर्दी करत असल्याने हा कमी ज्ञात असलेला निसर्गरम्य प्रदेश झपाट्याने लोकप्रिय होत आहे. या आकर्षणात आणखी भर म्हणजे स्थानिक विक्रेते बेबी कॉर्न, वडा पाव आणि गरम वाफाळणारी पेये विकत आहेत, जी थंडी आणि धुक्यात पर्यटकांच्या पावसाळ्याच्या चवीचा आस्वाद वाढवत आहेत.

 belgaum

पर्यटकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी लोकप्रिय ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. स्वच्छ भारत अभियान उपक्रमाचा भाग म्हणून सर्व प्रमुख ठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात असल्यामुळे विशेषतः कुटुंबे आणि महिला प्रवाशांसाठी सुरक्षित आणि स्वागतार्ह वातावरण राखण्यास मदत होत आहे. आंबोली हे केवळ धबधब्याच्या चाहत्यांचे एक आवडते ठिकाण नाही, तर या प्रदेशात अनेक निसर्गसंपन्न आकर्षणे आहेत. ज्यामध्ये पवित्र झऱ्याजवळ असलेले भगवान शिवाला समर्पित हिरण्यकेशी मंदिर; नागत्र धबधबा, महादेवगड पॉइंट, नारायणगड किल्ला आणि पावसाळ्यात जिवंत होणारी इतर अनेक दृश्ये यांचा समावेश आहे. हा परिसर पौराणिक कथा आणि अध्यात्माने भरलेला आहे.

येथील आजूबाजूच्या जंगलात 108 शिव मंदिरे लपलेली असली तरी आतापर्यंत त्यापैकी फक्त एक डझनच शोधण्यात आली आहेत. नागरिक आपली मुलं व कुटुंबासमवेत आंबोली वन उद्यानात फेरफटका मारून वर्षा सहलीचा आनंद लुटू शकतात. हा निसर्गाने नटलेला एक हिरवागार प्रदेश म्हणजे खेळण्याचे क्षेत्र तर आहेच शिवाय मलबार ग्लायडिंग फ्रॉग सारख्या प्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवास देखील आहे. यामुळे या ठिकाणच्या भेटीला एक शैक्षणिक वळणही मिळते.

पावसाळा जसजसा वाढत जाईल आणि धबधबे पूर्ण क्षमतेने कोसळण्यास सुरुवात होतील तसतसे आंबोलीत पर्यटकांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पश्चिम घाटातील सर्वोत्तम पावसाळी पर्यटनस्थळांपैकी एक म्हणून त्याचा दर्जा पुन्हा स्पष्ट होईल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.