बेळगाव लाईव्ह:संतीबस्तवाड (ता. जि. बेळगाव) गावात घडलेल्या पवित्र धर्मग्रंथांच्या विटंबनेच्या घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेण्यात आली असून चौकशीसाठी 5 विशेष समर्पित पोलीस पथकांची स्थापना केली असून यासंदर्भात कसून तपास केला जात असल्याची माहिती बेळगाव पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी दिली आहे.
बेळगाव तालुक्यातील संती बस्तवाड येथे रविवारी मध्यरात्री ही घटना घडली होती या घटनेनंतर या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते बेळगाव शहर परिसरातील मुस्लिम बांधवांनी चन्नम्मा चौकात हजारोंच्या संख्येने निदर्शने केली होती त्यावेळी पोलिसांनी आगामी तीन दिवसात आरोपींना गजाआड करू असे आश्वासन दिले होते.
सोमवारपासूनच पोलिसांनी तपासाची चक्रे हाती घेतली असून याचा तपास करण्यात येईल स्थानिक अधिकाऱ्यांच्या पाच टीम नियुक्त करण्यात आले आहेत तपास पथकांनी आधीच कांही पुरावे गोळा केले असल्याची पुष्टी केली आहे.
“आमच्याकडे कांही पुरावे आहेत आणि आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करू,” असे सांगून या प्रकरणाच्या तपासाच्या प्रगतीवर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
संतीबस्तवाड गावातील मशिदीला भेट देणाऱ्या भाविकांना एका शेल्फमधून पवित्र कुराण ग्रंथाच्या प्रतींसह अनेक प्रार्थना पुस्तके गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर विटंबनेची ही घटना उघडकीस आली. भाविकांचा शोध त्यांना गावाबाहेरील एका शेतात घेऊन गेला, जिथे त्यांना अर्धवट जळालेली पुस्तके व धर्मग्रंथ आढळल्यामुळे संतापाची लाट उसळली. परिणामी 12 मे रोजी रात्री तरुणांचा एक मोठा गट रस्त्यावर उतरला. या गटाने जोरदार निदर्शने करत तातडीने न्यायाची आणि घटनेत जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी केली.
बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ हे देखील निदर्शकांमध्ये सामील झाले होते. संतप्त मुस्लिम बांधवांच्यावतीने त्यांनी पोलिसांना निवेदन सादर केले. तसेच भूतकाळात अशाच प्रकारच्या घटना हाताळल्याबद्दल कायदा अंमलबजावणीवर टीका केली. “अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील घटनांमधील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात आली नसल्यामुळे समाजकंटकांना प्रोत्साहन मिळाले आहे,” असे ते म्हणाले. आमदार असिफ सेठ यांनी कांही पोलीस अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोपही केला आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्याची मागणी केली होती.
दरम्यान घटना घडलेल्या 24 तास अगोदरच मशिदी मधले सीसीटीव्ही का बंद करण्यात आले होते? कोण कोण असे कृत्य करू शकते यांचीही माहिती पोलिस गोळा करत आहेत असे हे कृत्य करणारे समाजकंटक कोण आहेतअशा सर्व अँगलने पोलीस तपास करत आहेत अशी माहितीही समोर येत आहे.
