बेळगाव लाईव्ह : महाड चवदार तळे सत्याग्रह हा भारतातील अस्पृश्यतेविरुद्धचा पहिला ऐतिहासिक लढा होता. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ बेळगावमध्ये ‘शोषितांचा संघर्ष दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. कर्नाटक दलित संघर्ष समिती (आंबेडकरवाद) बेळगाव जिल्हा शाखेतर्फे आयोजित या कार्यक्रमात दलित चळवळीशी निगडित विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतातून महत्त्वपूर्ण संदेश दिले.
बेळगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये गुरुवारी सकाळी ‘शोषितांचा संघर्ष दिन’ मोठ्या उत्साहात पार पडला. कर्नाटक दलित संघर्ष समिती (आंबेडकरवाद)च्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला राज्य खजिनदार सिद्धाप्पा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव महापालिका आयुक्त शुभा बी., विचारवंत भीमपुत्र बी. संतोष आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे निवृत्त प्राध्यापक श्रीकांत प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर मनपा आयुक्त शुभा बी. यांनी महाड चवदार तळे सत्याग्रहाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यतेविरुद्ध उभारलेल्या लढ्याची आठवण करून देत, समाजाने आजही समानतेच्या तत्वांचा स्वीकार करावा, असे मत व्यक्त केले.
महाडच्या सत्याग्रहामुळे दलित समाजाला प्यायला पाणी मिळाले. हा संघर्ष आजही प्रेरणादायी आहे. महाड सत्याग्रहाचे दुर्मिळ छायाचित्र मोठ्या प्रमाणात प्रदर्शित करण्यासाठी मी राज्य सरकार व समाजकल्याण विभागाकडे प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले. भीमपुत्र बी. संतोष आणि प्रा. श्रीकांत यांनीही आपल्या भाषणातून सामाजिक जागृतीवर भर दिला. कार्यक्रमादरम्यान सिद्धाप्पा कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महांतेश तळवार, मल्लेश चौगुले, नागेश कामशेट्टी, संतोष तळवार, सागर कोळेकर, लक्ष्मण कांबळे, भैरू मेत्री, दीपक धबाडे, निंगाप्पा कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.