बेळगाव लाईव्ह :निवडणुकीवेळी काँग्रेसने घोषित केलेल्या गृहलक्ष्मी, गृहज्योती, शक्ती, अन्नभाग्य आणि युवा निधी या पंचहमी योजना राबविण्यात राज्य सरकारला आलेले अपयश, मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या त्रासामुळे लोकांनी केलेल्या आत्महत्त्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या आणि राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था याच्या निषेधार्थ निधर्मी जनता दलाच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे आज शहरात आंदोलन छेडून राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले.
बेळगाव जिल्हा निधर्मी जनता दलातर्फे जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी सकाळी कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या विरोधात राणी चन्नम्मा चौक येथे आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात बेळगाव शहर परिसरासह जिल्ह्यातील बहुसंख्य निजद कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हातात निषेधाचे फलक आणि पक्षाचा ध्वज घेऊन जमलेल्या या कार्यकर्त्यांनी काँग्रेस सरकारच्या विरोधात धिक्काराच्या घोषणा देत चौकात ठिय्या मारून रास्तारोको केला. त्यामुळे चौकातील वाहतूक कांही काळ विस्कळीत झाली होती. चन्नम्मा सर्कल येथील आंदोलनानंतर आंदोलनकर्त्यांनी मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन राज्यपालांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
निवेदनात काँग्रेसच्या पंचमी योजना राबविण्यात राज्य सरकारला आलेले अपयश त्यामुळे जनतेची झालेली फसवणूक आणि त्यांना होत असलेला त्रास, त्याचप्रमाणे मायक्रो फायनान्स कर्जदारांच्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबाबत तपशीलवार माहिती नमूद करण्यात आली आहे. याबद्दल राज्य सरकार दोषी ठरवून निषेध करण्याबरोबरच आत्महत्या केलेल्या संबंधितांच्या कुटुंबीयांना योग्य नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
आंदोलनाप्रसंगी बेळगाव लाईव्हसमोर प्रतिक्रिया व्यक्त करताना निजद बेळगाव महानगर शाखा अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी कर्नाटकातील काँग्रेसचे विद्यमान सरकार निवडणुकीवेळी पंचहमी योजनांची घोषणा करून सत्तेवर आले. या पाच योजनांपैकी गृहलक्ष्मी योजनेचे उदाहरण घ्यायचे झाल्यास यातील महिला लाभार्थींना दरमहा मिळणारे 2100 रुपये आता तीन-चार महिने झाले मिळालेले नाहीत.
एक पैसाही संबंधित महिलांच्या बँक खात्यात जमा नाही. त्याचप्रमाणे राज्यातील रस्ते वगैरे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी या दिवाळीखोर सरकारकडे पैसे नाहीत आणि म्हणूनच याच्या निषेधार्थ आम्ही आज आंदोलन करत आहोत अशी माहिती दिली.