बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या प्रमुख आश्वासनांपैकी एक असलेली गृहलक्ष्मी हमी योजना ३० ऑगस्ट २०२३ रोजी सुरु करण्यात आली. मात्र हि योजना सुरु झालेल्या पहिल्या काही टप्प्यातच अधून मधून बंद पडली. लाभ्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणारी रक्कम अनेकवेळा थकली. मात्र विरोधक आणि जनतेतून सातत्याने विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमुळे काही कालावधीनंतर थकलेला निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. मात्र गेल्या २ महिन्यांपासून हमी योजना विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेसच्या पाच हमी योजनांपैकी गृहलक्ष्मी आणि अन्नभाग्य योजनांचा निधी गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ठप्प झाला आहे. त्यामुळे हजारो लाभार्थ्यांमध्ये चिंता आणि संभ्रम वाढला आहे. सरकारकडून योजनांचा निधी लवकरच मिळेल, असे आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्षात निधी जमा होत नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस सरकारने विधानसभा निवडणुकीत पाच हमी योजनांचे आश्वासन दिले होते. त्यामध्ये गृहलक्ष्मी, शक्ती, अन्नभाग्य, विद्यानिधी आणि गृहज्योती योजनांचा समावेश आहे. सुरुवातीच्या काळात मोठ्या गाजावाजात या योजना सुरू करण्यात आल्या. मात्र, सध्या गृहलक्ष्मी आणि अन्नभाग्य योजनांचा निधी रखडल्याने लाभार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे.
अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला १० किलो तांदूळ देण्याची घोषणा झाली होती. मात्र, तांदळाचा तुटवडा आणि केंद्राकडून सातत्याने मिळणाऱ्या नकाराचे कारण पुढे देत तांदळाऐवजी प्रतिव्यक्ती १७० रुपये देण्याचा निर्णय झाला. सुरुवातीच्या काही महिन्यांत लाभार्थ्यांच्या खात्यावर हा निधी जमा होत होता. मात्र, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून निधी जमा न झाल्याने योजनांचे भवितव्य काय? असा प्रश्न लाभार्थ्यांकडून विचारला जात आहे.
यासंदर्भात काँग्रेस सरकारचे वरिष्ठ नेते आणि मंत्री पाच हमी योजना बंद होणार नाहीत, त्या सुरळीत सुरू राहतील, असे आश्वासन देत आहेत. मात्र, प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी जमा होत नसल्याने सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अन्नभाग्य योजनेंतर्गत दारिद्र्या रेषेखालील लाभार्थ्यांना दरमहा माणसी 5 किलो धान्याचा मोफत पुरवठा केला जातो. मात्र, मागील काही महिन्यांपासून सर्व्हर आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे रेशन वितरणात अडचणी येऊ लागल्या आहेत.
मागील काही महिन्यांपासून रेशन वितरणाची प्रक्रिया विस्कळीत होऊ लागली आहे. फेब्रुवारी महिन्यातदेखील रेशन वितरणास विलंब झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लाभार्थ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. दरमहा 4 ते 5 तारखेदरम्यान रेशन वितरण होणे आवश्यक आहे. मात्र, 13 फेब्रुवारी उजाडला तरी लाभार्थ्यांच्या पदरात रेशन नाही, अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे.