बेळगाव लाईव्ह : बेळगुंदी (ता. जि बेळगाव) येथील बालवीर विद्यानिकेतन शाळेमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनीस) बेळगावतर्फे आयोजित अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भातील जागृती कार्यक्रम नुकताच प्रात्यक्षिकांसह पार पडला.
बालवीर विद्यानिकेतन येथे बेळगाव अंनीसचे सचिव शंकर चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना महाराष्ट्रातील अंनिसचे कार्यकर्ते अण्णा कडलास्कर व डी. जे. वाघमारे यांनी परंपरागत चालत आलेल्या रुढी परंपरा आज समाजामध्ये खूप घातक ठरत आहेत आणि या रुढी परंपरा माणसानेच ठरवलेल्या आहेत.
ही वस्तुस्थिती मुलांच्या मनात बिंबविणे व संबंधित वाईट परंपरा समाजातून हद्दपार करून वैज्ञानिक दृष्टिकोन अवलंबिणे हा एकच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अंनिसचे कार्यकर्ते आज धडपडत आहेत असे सांगितले. यासाठी बाल वयातच विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टीपासून सावध करणे, त्यांच्या मनातील भीती घालवणे, पुरोगामी विचार त्यांच्या अंगी रुजविणे, गळ्यात किंवा पायात दोरा बांधणे, कपाळाला भंडारा लावणे किंवा लिंबू, नारळ आजूबाजूला किंवा रस्त्यावर फेकून दिले म्हणजे आपल्याला कोणतीही भूतबाधा होत नाही
किंवा करणी केल्याने आपल्याजवळ भरपूर धनदौलत येते हा आपल्या मनाचा भ्रम आहे, हे उपस्थित विद्यार्थ्यांना समजावून देत तो भ्रम सिद्ध करणारी तंत्र-मंत्र, भोंदूगिरीची प्रात्यक्षिके अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सादर केली. यावेळी व्यासपीठावर संयोजक शंकर चौगुले, अर्जुन चौगुले, दशरथ पाऊसकर,
विलास हुबळीकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा शहापूरकर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद गावडे यांनी केले, तर आभार मेटकर यांनी मानले.