बेळगाव लाईव्ह :राज्यातील 9 विद्यापीठे बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या बेळगाव शाखेतर्फे आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सरकारला निवेदन सादर करण्यात आले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आजच्या या मोर्चात शहरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी -विद्यार्थिनी हातात निषेधाचे फलक आणि अभावीपचे ध्वज घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या विद्यार्थ्यांनी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन केले. याप्रसंगी विद्यार्थी -विद्यार्थिनींनी मानवी साखळी करून कांही काळ रास्तारोको करण्याद्वारे आपला निषेध व्यक्त केला. यावेळी भारत माता की जय या घोषणेसह सरकारचा धिक्कार करणाऱ्याजोरदार घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी चौक दणाणून सोडला होता.
त्यानंतर मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आले. राज्यातील तब्बल नऊ विद्यापीठे बंद करण्यात आल्यास लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे विद्यापीठे बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अभावीपच्या आजच्या या आंदोलनाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून रास्ता रोको केल्यामुळे चन्नम्मा सर्कल येथील वाहतूक अल्पकाळ विस्कळीत झाली होती.