Friday, September 27, 2024

/

विविध मागण्यांसाठी तलाठी संघटनेचा धरणे सत्याग्रह

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सरकारने नेमून दिलेल्या ठरलेल्या कामाव्यतिरिक्त अवांतर कामाचा बोजा वाढवल्याच्या निषेधार्थ तसेच ऑनलाइन कामासाठी लॅपटॉप प्रगत, मोबाईल वगैरे आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात, वगैरे विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य तलाठी संघटनेच्या बेळगाव शाखेतर्फे आज गुरुवारी बेळगाव तालुका तलाठी कचेरीसमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे.

आपल्या विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य तलाठी संघटनेतर्फे आज गुरुवारपासून राज्यव्यापी आंदोलन हाती घेण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून बेळगाव जिल्ह्यातील तलाठ्याने बेमुदत धरणे सत्याग्रह सुरू केला आहे या संदर्भात बेळगाव लाईव्ह समोर प्रतिक्रिया व्यक्त करताना बेळगाव तलाठी संघटनेचे अध्यक्ष एस. बी. शिंदे म्हणाले की, अलीकडे सरकारने आम्हा तलाठ्यांना नेमून दिलेल्या ठरलेल्या कामांव्यतिरिक्त अवांतर कामे देण्यास सुरुवात केली आहे. या कामांसाठी आवश्यक लॅपटॉप, प्रगत मोबाईल वगैरे कोणत्याही सुविधा न देता संबंधित कामे आमच्याकडून करून घेतली जात आहेत. त्यामुळे तलाठ्यांवरील कामाचा ताण वाढवून त्यांना मानसिक त्रास होऊ लागला आहे. त्याचप्रमाणे आमची ठरलेली दैनंदिन कामे करण्यातही अडथळा निर्माण होत आहे. संबंधित सर्व सुविधा मला मिळाव्यात अशी आमची मागणी असून त्यासाठी आम्ही हे राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू केले आहे. सध्या आम्ही सर्व तलाठी संघटितपणे आमच्या बेळगाव तालुका कचेरी समोर हे बेमुदत आंदोलन करत असून उद्या शुक्रवारी हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडले जाणार आहे. तसेच त्यानंतर आमच्या राज्याध्यक्षांनी आदेश दिल्यास बेंगलोर राजधानीच्या ठिकाणी मोठे आंदोलन छेडले जाईल, अशी माहिती देऊन आमचे आंदोलन निदर्शने वगैरे न करता शांततेने सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

बेळगाव तालुक्यात चार-पाच वर्षांपासून तलाठी म्हणून कार्यरत असणाऱ्या कौसरबी कर शाबू आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाल्या सरकार अलीकडे आमच्याकडून ढीगभर विविध कामे करून घेत आहे. यंत्रापेक्षाही अधिक कामे आमच्याकडून करून घेतली जात असून आम्ही एखाद्या यंत्रमानवाप्रमाणे झालो आहोत. हातात असलेले काम पूर्ण होण्याआधीच भराभर पुढची कामे दिली जात जातात. आमच्या मागे कायम कामांचा तगादा लावण्यात येतो. दररोज सकाळी 7 वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत राबवूनही आमची कामे संपत नाहीत. त्यामुळे आम्हाला आमच्या कुटुंबीयांकडे लक्ष देण्यासही सवड मिळेनाशी झाली आहे. घरचे एकही काम न करता आम्हाला सारखी कार्यालयीन कामे करावी लागत आहेत.Talathi

याबद्दल तक्रार केल्यास “तुम्हाला या कामासाठीच नेमले आहे जमत नसेल तर नोकरी सोडून जा” असे धमकावून आमच्याकडून कामे करून घेतली जात आहेत. आम्ही अंगावर पडेल ती कामे करण्यास तयार आहोत परंतु त्या बदल्यात किमान आम्हाला माणुसकीची वागणूक दिली जावी एवढीच अपेक्षा आहे. कारण वाढलेला कामाचा ताण, वरिष्ठांचा दबाव यामुळे आमच्यापैकी अनेकांच्या तब्येतीवर परिणाम झाला असून काहींना हृदय विकाराचा धक्का, अर्धांगवायूचा झटका, रक्तदाब समस्या वगैरे विकार उद्भवले आहेत.

त्यामुळे काहींचे अकाली निधन झाले असून काहींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मात्र तरीही सरकारने आमच्या समस्येची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. कार्यालयीन कामाच्या बोजामुळे आम्हाला आमच्या घराकडे लक्ष देण्यास सवड मिळत नाही. तेव्हा सरकारने आमच्या कुटुंबीयांचाही तरी विचार करावा. आठवड्यातील शनिवार रविवार या सुट्टीच्या दिवशी देखील आमच्याकडून कामे करून घेतली जातात. त्याचप्रमाणे आम्ही दिलेले कामे करण्यास तयार आहोत मात्र त्या कामांसाठी आवश्यक सुविधा देखील पुरवल्या गेल्या पाहिजेत.

कामानिमित्त आम्ही एखाद्या गावात गेलो तर तेथे तलाठ्यांसाठी वेगळे कार्यालय नसते ही सध्याची स्थिती आहे. ग्रामपंचायतीची एखादी खोली आम्हाला दिली जाते. ज्या ठिकाणी वीज पुरवठा वगैरे समस्यांचा सामना करावा लागतो असे सांगून कार्यालयीन काम ऑनलाईन करण्यास सांगितले जाते. मात्र त्यासाठी आवश्यक लॅपटॉप, प्रगत मोबाईल वगैरे कोणत्या सुविधा उपलब्ध केल्या जात नाहीत अशी तक्रार तलाठी कौसरबी यांनी केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.