Tuesday, February 4, 2025

/

बळ्ळारी नाल्याचा युद्धपातळीवर विकास साधा -कृषिमंत्र्यांकडे मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :दरवर्षी पावसाळ्यात शेत पिकांचे होणारे कोट्यावधी रुपयांचे नुकसान टाळण्यासाठी युद्धपातळीवर बळ्ळारी नाल्याची स्वच्छता करून विकास साधला जावा. त्याचप्रमाणे भू -महसूल कायदा पायदळी तुडवून भूमाफियांकडून बेळगाव परिसरातील शेतजमिनींमध्ये बेकायदा भूखंड पाडून त्याची विक्री करण्याच्या प्रकाराला तात्काळ आळा घालावा, अशी मागणी आज शेतकरी संघटनातर्फे राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे करण्यात आली.

कर्नाटक राज्य रयत संघ व हसिरु सेने आणि निगिल योगी रयत सेवा संघ यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी आज बुधवारी सकाळी शहरातील काँग्रेस भवन येथे राज्याचे कृषिमंत्री चलूवराय स्वामी यांची भेट घेऊन  बेळळारी नाल्यामुळे होणाऱ्या नुकसानीच्या फोटोंसह उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांना सादर केले.

तसेच आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. बेळगाव येळ्ळूर रस्त्यापासून हुदलीपर्यंत वाहणाऱ्या तुम्हारे 28 कि.मी. अंतराच्या बळ्ळारी नाल्याचा गेल्या अनेक वर्षांपासून विकास झाला नसल्यामुळे आसपासच्या शेत पिकांचे नुकसान होत आहे. राज्यातील मागील भाजप सरकारने बळारी नाल्याच्या विकासासाठी 800 कोटी रुपये खर्च करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यापैकी 8 रुपये देखील खर्च केले नाहीत. आता तुमचे सरकार शेतकऱ्यांचे सरकार म्हणून राज्यात सत्तेवर आले आहे. तेंव्हा बळारी नाला परिसरातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सदर नाल्याची युद्धपातळीवर अतिक्रमण काढून खुदाई करण्याद्वारे विकास साधण्यात यावा.Nala

त्याचप्रमाणे कर्नाटक भू -महसूल कायदा 1964 कलम 95 अनुसार कोणतीही कृषी जमीन कोणत्याही प्रकारच्या व्यवसायासाठी वापरता येत नाही. तथापि हा कायदा पायदळी तुडवून भूमाफियांकडून बेळगाव परिसरातील शेतजमिनींमध्ये बेकायदा भूखंड पाडून विक्री केली जात आहे. सदर भूखंड घरे बांधण्यासह इतर व्यावसायिक कारणासाठी वापरले जात असल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे. तेंव्हा सरकारने सदर गैरप्रकाराला ताबडतोब आळा घालावा, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी कृषी मंत्र्यांकडे केली. त्याचप्रमाणे या परिसरातील शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांचा गांभीर्याने विचार करून त्यांचे तात्काळ निवारण केले जावे, अशी विनंती देखील केली.

निवेदनाचा स्वीकार करून बोलताना कृषी मंत्री चलुवराय स्वामी यांनी बळ्ळारी नाल्याचा प्रश्न प्रलंबित आहे याची आम्हाला कल्पना आहे. या नाल्याची समस्या निवारण्याचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत असे सांगून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी रवी पाटील, राजू मरवे आदी शेतकरी नेत्यांसह कर्नाटक राज्य रयत संघ व हसिरु सेने तसेच निगिल योगी रयत सेवा संघाचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.