सध्या आज बुधवारी तसेच गेल्या कांही दिवसांपासून बेळगाव शहराचे तापमान 33 अंश सेल्सिअस इतके स्थिर असले तरी मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल आणि वाढत असलेले कॉंक्रिटीकरणाचे जंगल यामुळे अलीकडे बेळगाव शहराच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
गरिबांचे महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावचा पारा अलीकडे वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक जण घरातून बाहेर पडताना विचार करत आहेत. गेल्या एप्रिलच्या मध्यावधीत शहराचे तापमान वाढवून 38 अंश सेल्सिअस इतके झाले होते. त्यावेळीच हवामान खात्याने हे तापमान 40 अंशावर जाण्याची शक्यता वर्तवली होती. बेळगाव शहरात आज 33 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली असली तरी उकाड्याची तीव्रता फारशी कमी झालेली नाही.
डांबरी रस्त्यांऐवजी अलीकडे काँक्रीटचे रस्ते करण्यात आले आहेत. त्यामुळे तापलेल्या काँक्रेट वरून चालताना उष्म्याची झळ अधिकच जाणवत आहे.
शहरातील उष्णता वाढ झाल्यामुळे उष्मापासून बचाव करण्यासाठी अनेक जण फॅन, एसी व कुलरचा वापर करताना दिसत आहेत. उन्हामुळे बाजारपेठेवर देखील परिणाम होऊ लागला आहे. विकासाच्या नावाखाली केली जाणारी वृक्षाची कत्तल त्याचप्रमाणे उभारण्यात येत असलेल्या मोठमोठ्या काँक्रीटच्या इमारती यामुळे बेळगाव शहर परिसरातील पर्यावरणाचा तोल ढळला असल्याचे तज्ञांसह जाणकारांचे मत आहे.
ही फक्त सुरुवात आहे जर झाडांची कत्तल सुरूच राहिल्यास यापुढे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होणार असल्याचा इशाराही सदर मंडळींनी दिला आहे. त्याचप्रमाणे एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी खबरदारीची पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.