बेळगाव लाईव्ह : सीमाभागातील मराठी भाषिक जनता सत्ता, पद किंवा येथील सरकारविरोधात वा स्थानिकांविरोधात निवडणूक लढवत नाही तर आपल्यावर होणारा अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी, विधानसभेत आवाज उठविण्यासाठी निवडणूक लढविले. येथील प्रशासनाकडून मिळणारया दुटप्पी वागणुकीविरोधात विधिमंडळात आवाज उठविण्यासाठी आपल्या विचारांच्या प्रतिनिधीला आमदार म्हणून निवडून देण्याची आज गरज असून यासाठी सीमाभागातील तमाम मराठी भाषिकांनी मतांच्या माध्यमातून एकजूट दाखवून, पाठिंबा दढवून आपला उमेदवार निवडून आणणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रवादीचे आम. रोहित पवार यांनी व्यक्त केले.
आज चव्हाट गल्ली येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे आयोजिलेल्या उत्तर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार अमर येळ्ळूरकर यांच्या जाहीर सभेत ते बोलत होते. प्रारंभी जल्लोषात रोहित पवार, अमर येळ्ळूरकर आणि मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी आपल्या भाषणात रोहित पवार यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या इतिहासाचे स्मरण केले. याचप्रमाणे सिमाचळवळीच्या पहिल्या तुकडीत अग्रेसर राहिलेले किसनराव येळ्ळूरकर यांच्या कार्याचेही समरण केले. सीमाभागातील अशा अनेक मान्यवरांचे, हुतात्म्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले असून हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपल्याला मिळाली असून या संधीचा लाभ घेत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, युवा आणि महिलांसह संपूर्ण सीमाभागातील मराठी मतदारांनी कुटुंबासमवेत मराठी विचारांना पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे रोहित पवार म्हणाले.
या लढ्यात तरुण पिढीचा सहभाग नसल्याचे बोलले जाते. मात्र युवा पिढीला कमी लेखू नये, असे सांगत युवा पिढीमध्ये जी ताकद आहे त्या ताकदीने, शक्तीने हा लढा आणखीन पुढे जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
येत्या निवडणुकीत मराठी भाषिकांच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने नक्कीच समितीचे उमेदवार विजयी ठरतील, असे सांगत माजी आमदारांच्या डावलण्यात आलेल्या उमेदवारीवरूनही त्यांनी कानपिचक्या दिल्या. अजूनही वेळ गेलेली नसून मराठी माणसांच्या प्रवाहात सामील व्हा, असे जाहीर आवाहन देखील रोहित पवार यांनी व्यासपीठावरून दिले.