बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डसह देशातील 57 कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या निवडणुका महिन्याभरातच रद्द करण्यात आल्या असून संरक्षण मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
निवडणुका रद्द करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या अधिसूचनेमध्ये 17 फेब्रुवारीला दिलेली निवडणूक अधिसूचना आपण मागे घेत असल्याचे म्हंटले आहे.
मंत्रालयाची अधिसूचना संख्या का. नि. आ. 3 (अ) मागे घेण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाने गेल्या 17 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी करून देशभरातील 57 कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका 30 एप्रिलला होतील, तसेच 1 मे रोजी निकाल जाहीर केला जाईल असे नमूद केले होते.
निवडणुकीची घोषणा करण्यात आल्यामुळे त्यानुसार तयारी केली जात होती. गेल्या 2 मार्चपासून मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानंतर गेल्या 16 मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली होती. तसेच 17 मार्चपासून उमेदवारी अर्ज वितरण प्रक्रिया सुरू झाली असताना आता निवडणूक रद्द करण्यात आल्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या लोकनियुक्त सदस्यांचा कालावधी 2 वर्षांपूर्वी पूर्ण झाला होता. त्यानंतर बोर्डाचे कामकाज मराठा लाईट इन्फंट्रीचे ब्रिगेडियर आणि सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून हाताळले जात आहे.
बेळगाव कॅन्टोन्मेंट कार्यक्षेत्रात एकूण 7 प्रभाग आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे महापालिकेकडे हस्तांतर केले जाणार होते. त्यामुळे सध्या रद्द झालेली निवडणूक पुन्हा होणार? की बोर्डाचे महापालिकेत विलीनीकरण होणार याबाबत अद्यापही साशंकता आहे.