जुन्या पी. बी. रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूलाच्या ठिकाणी भूमिगत गटार तुंबून रस्त्यावर आणि आसपासच्या दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याच्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत आज शनिवार दुपारपासून महापालिकेने सदर गटारीच्या सफाईसह दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज पुलाच्या बाजूला असलेले भूमिगत गटार तुंबून दुकानांमध्ये पाणी शिरले होते. त्याचबरोबर या परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये देखील पाणी गेले होते. यामुळे दुकानदार आणि व्यवसायिकांना आपले व्यवसाय बंद करण्याची वेळ आली होती.
चेंबरमधून ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर पसरलेल्या पाण्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांनी देखील आवाज उठवला होता. सदर गटार सुमारे 100 फुटापर्यंत कचऱ्यामुळे तुंबून राहिल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होणे बंद झाले होते. परिणामी दरवर्षी पावसाळ्यात या गटारीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची समस्या उद्भवत होती.
गेल्या कांही दिवसात पुन्हा ही समस्या उद्भवल्याने या भागातील संतप्त दुकानदार, व्यावसायिक आणि नागरिकांनी काल शुक्रवारी मनपा आयुक्तांसह जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रशासक नितेश पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. सदर गटारीची तातडीने स्वच्छता व दुरुस्ती करून पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. निवेदन स्वीकारून जिल्हाधिकाऱ्यांनी देखील त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार महापालिकेकडून आज दुपारपासून गटार दुरुस्ती व सफाईच्या कामाला प्रारंभ झाला आहे.
महापालिकेच्या अभियंता मंजुश्री यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज दुपारी जेसीबीच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज पुलाशेजारील भूमिगत गटार खुदाई करून खुली केली असता हंगिरकर कॉम्प्लेक्स ते पुलाच्या कठड्यापर्यंत असे सुमारे 100 फुटापर्यंत प्लास्टिक पिशव्या, केरकचरा, माती आदींमुळे गटार चोकअप झाल्याचे निदर्शनास आले. आता सदर गटारीची साफसफाई आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे संबंधित गटारीमुळे रस्त्यावर पाणी साचून ते व्यवसाय धंद्याच्या ठिकाणी शिरण्याची गेल्या कांही वर्षापासून भेडसावणारी समस्या दूर होणार असल्याने परिसरातील दुकानदार आणि व्यवसायिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

अशी घेतली दखल
सोशल मीडियातून ही पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याची बातमी सर्वप्रथम बेळगाव live ने जनते समोर आणली होती .बेळगाव live ने रस्त्यावर तुंबलेले पाणी असलेला व्हीडिओ प्रसिद्ध केला होता तोच व्हीडिओ चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष विकास कलघटगी यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि मनपा आयुक्त यांना दाखवला त्यामुळे याची तीव्रता अधिकाऱ्यांना समजली आणि त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना सदर समस्येकडे लक्ष देण्याचे आदेश दिले.
सामाजिक कार्यकर्ते विकास कलघटगी आणि माजी नगरसेवक बाळासाहेब काकतकर यांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर करतेवेळी बेळगाव live चा व्हीडिओ अधिकाऱ्यांना दाखवला होता.