केंद्र आणि राज्य सरकारने सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका (डीसीसी) आणि अपेक्स बँक विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला असून ही प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, असे आवाहन बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी केले आहे.
हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी गावातील हुल्लोळी अरिहंत सहकारी संस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. केंद्र सरकारने राष्ट्रीयीकृत बँकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला सहकारी बँकांकडून आर्थिक सहाय्य मिळत आहे.
आता जिल्हा मध्यवर्ती बँक आणि अपेक्स बँक विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला असून यासंदर्भात राजकारण वगळून सहकार क्षेत्र वाचविण्यासाठी जनता आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विचारविनिमय करण्यात यावा, अशी मागणीही रमेश कत्ती यांनी केली.
यावेळी सहकार नेते जयपाल चौगुला, रवींद्र चौगुला, जिन्नाप्पा सप्तसागर, ॲड. पी. आर. चौगुला, बाबू चौगुला, रामाप्पा गोटुरी, आनंद चौगुला आदी उपस्थित होते.