भारतीय जनता पक्षाच्या त्रिकुटाने माझा विश्वास घात केला आहे. वेळ आल्यावर त्यांची नांवे जाहीर करू, ते माझा तिरस्कार करतात, योग्य वेळी त्यांना धडा शिकवू, असा इशारा राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी स्वपक्षीय नेत्यांनाच दिला आहे.
आमदार रमेश जारकीहोळी अचानक काल मंगळवारी रात्री दिल्लीला रवाना झाले. आपल्याला रात्री दोनला अचानक फोन आल्याने दिल्लीला जावे लागले असे त्यांनी सांगितले. रमेश जारकीहोळी यांनी दिल्लीला पोचल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांची एका आरएसएस नेत्याच्या घरी सुमारे 45 मिनिटे बैठक झाली. तथापी या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे समजू शकले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात औत्सुक्य निर्माण झाले आहे. दिल्लीत जारकीहोळी आणखी कांही भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याचे समजते.
दिल्लीत आगमन झाल्यानंतर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना, जारकीहोळी म्हणाले की भाजपमधील तिघा जणांनी माझा विश्वास घात केला आहे. या तिघांची नावे मी आत्ताच सांगणार नाही, वेळ आल्यावर ती जाहीर करण्यात येतील. ते माझा द्वेष करीत आहेत. माझी बदनामी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांचे षड्यंत्र उघड होण्याचा काळ आता जवळ आला आहे असे बोलून त्यांनी स्वपक्ष्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. आपला द्वेष करणाऱ्यांविरुद्ध भाजप हायकमांडकडे ते तक्रार करण्याची शक्यता आहे दुसऱ्या पक्षातून येऊन जारकीहोळी भाजपमध्ये वरचढ होण्याची संबंधितांना भीती आहे. त्यामुळे संबंधित नेते आपल्याविरुद्ध कटकारस्थान रचत असल्याची रमेश जारकीहोळी यांची तक्रार आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात रमेश जारकीहोळी मुंबईला गेले होते. तेथे भाजप नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली. आपल्यामुळे कर्नाटकात भाजप सत्तेवर आला आहे, मात्र आपल्यालाच मंत्रिमंडळातून वगळण्याचे षड्यंत्र रचण्यात आले आहे, अशी त्यांनी फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच ते दिल्लीला गेले असून स्वतः फडणवीसही तेथे उपस्थित आहेत. फडणवीस भाजप नेत्यांकडे जारकिहोळी यांची बाजू मांडणार असल्याचे समजते.