केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांच्या पत्नींना आगामी बेळगांव लोकसभा पोट निवडणुकीचे तिकीट मिळावे अशी माझी आणि आम्हा सर्वांचीच इच्छा आहे. तथापि जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते यासंदर्भातील निर्णय घेतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव शंकरगौडा पाटील यांनी दिली.
सोमवारी सकाळी बेळगाव जिल्ह्यातील प्रधानमंत्री जनकल्याणकारी प्रचार-प्रसार अभियानाचा शुभारंभ केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शंकरगौडा पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की, दिवंगत अंगडी यांच्या पत्नींना तिकिट मिळाल्यास आपण सर्वजण जसे सुरेश अंगडी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतो तसेच त्यांच्या पत्नीच्या पाठीशी देखील उभे राहूया. तथापि जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा पालकमंत्री हे सर्वजण आगामी पोटनिवडणुक तिकिटाच्या बाबतीत कोणता निर्णय घेतात हे प्रथम पहावे लागणार आहे. या प्रक्रियेत भाग घेण्याइतका मी मोठा झालेलो नाही.
खासदार सुरेश अंगडी यांचे निधन ही अचानक घडलेली अत्यंत दुःखद घटना आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की जनतेची सहानुभूती ही त्यांच्या कुटुंबाच्या बाजूने आहे. अंगडी कुटुंबातील व्यक्तीलाच आगामी निवडणुकीचे तिकीट मिळावे अशी त्यांची अपेक्षा आहे. स्वतः मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी अंगडी कुटुंबीयांची भेट घेतली आहे. तसेच दिल्ली येथे सुरेश अंगडी यांचे जे स्मारक उभारण्यात येणार आहे, त्या ठिकाणी मी आपल्या अभियंत्यांसह जाऊन भेट दिली आहे. निवडणुकीच्या तिकीटासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी अंगडी कुटुंबियांची भेट घेऊन चर्चा केली असली तरी तिकीट कोणाला द्यायचे याबाबतीत पक्षाचा निर्णय अंतिम असतो. स्वतः मुख्यमंत्री देखील हा निर्णय घेऊ शकत नाहीत, परंतु त्यांची अंगडी कुटुंबियांना सहानभूती आहे.
पोटनिवडणुकीच्या तिकीटासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी अंगडी कुटुंबीयांशी जेंव्हा चर्चा केली. त्यावेळी त्यांच्यासमवेत बसवराज बोम्मई, रमेश जारकीहोळी आदी मंत्रीगण देखील उपस्थित होते. आम्ही सर्वजण पक्षाच्या आदेशानुसार कार्य करतो. मी स्वतः पक्षाच्या आदेशावरून विविध पदावर काम केले आहे. त्यामुळे आगामी बेळगांव लोकसभा पोटनिवडणुकीच्या तिकीटा संदर्भात पक्षाचा निर्णय अंतिम राहील. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या रूपाने राज्याला एक समर्थ नेतृत्व मिळाले आहे. त्यांनी आपला 3 वर्षाचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण करतील त्यामुळे तेंव्हा त्यांना पदच्युत करण्याचे स्वप्न कोणीही पाहू नये, असेही शंकरगौडा पाटील यांनी शेवटी स्पष्ट केले.