Saturday, October 19, 2024

/

बेळगावचे राजकारण चाललंय तरी कुठे?

 belgaum

राजकारण म्हटलं की स्पर्धा आली, रस्सीखेच आली आणि एकमेकाविरोधात शड्डू ठोकण्याची भावनाही आली. पण काहीवेळा राजकारणात सर्व स्पर्धा बाजूला ठेऊन निर्णय घेण्याची वेळ येते. अनेकदा देश पातळीवर हे सिद्ध झाले आहे. माणुसकीचा विचार पुढे करून काही वेळा दिग्गज राजकारणीसुद्धा दोन पावले मागे घेतात. पण बेळगावच्या राजकारणात या माणुसकीचा अभाव दिसत आहे. यामुळे आजकाल बेळगावचे राजकारण चालले आहे तरी कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे.

हा मुद्दा आता कोणती माध्यमे चर्चेत आणत नाहीत तर सर्वसामान्य नागरिक ही चर्चा करीत आहेत. ही चर्चा सुरू झाली ती सुरेश अंगडी यांच्या मृत्यू नंतर सुरू झालेला राजकीय घोडेबाजार पाहून. अंगडी यांच्या विरोधी पक्षात घोडेबाजार सुरू झाला हे सुद्धा लोकांना पटलेले नाही, पण त्यांच्याच भाजप या पक्षात सुद्धा अनेक घोडे खासदार होण्यासाठी टपलेले आहेत हे पाहून सामान्य नागरिक आणि विशेषतः भाजप कार्यकर्ते दुखावले जात आहेत.

सुरेश अंगडी हे चारवेळा खासदार झाले. पहिल्या तीन टर्म मध्ये त्यांनी काय विशेष प्रभाव दाखवला नाही. तिसऱ्या वेळी निसटता विजय आणि चौथ्यांदा तर प्रचंड विरोध सहन करून फक्त आणि फक्त मोदींच्या जीवावर विजय ही त्यांची प्रगतीची दिशा होती. पण यावेळी खासदार होताच सिनियर म्हणून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. ही माळ पडल्यावर तरी साहेब काम करा अशा प्रतिक्रिया जनतेने दिल्या आणि दिवंगत अंगडी साहेब खरंच कामालाही लागले होते.

अनेक नवीन रेल्वे योजना, पूल, रेल्वे प्रकल्प त्यांनी देशभरात सुरू केले. अनेक आराखडे आखले. आणि कधी नव्हे ती त्यांची आणि त्यांच्या कामांची प्रशंसा होत होती. याच गोष्टीला बहुतेक दृष्ट लागली आणि सुरेश अंगडी यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला.
हा मृत्यू आजारी पडून किंवा अपघाती या प्रकारातील नव्हे. नैसर्गिक आणि अनपेक्षित असा हा दुर्दैवी मृत्यू. हा मृत्यू आला नसता तर सुरेश अंगडी यांनी आपली टर्म पूर्ण केली असती आणि बहुतेक ते पुन्हा खासदार, मंत्री झाले असते. ते तर सोडाच कर्नाटकात मुख्यमंत्री एडीयुरप्पा यांना हटवून त्यांना मुख्यमंत्री बनविण्याचे प्रयत्न जोरात सुरू होते.
अशात त्यांच्या पदरात मृत्यू आला आणि त्यांचे कुटुंबच नव्हे ते त्यांचा मतदारसंघच हेलावून गेला. अंगडी हे सामान्य कुटुंबातून वर आलेले आणि यशस्वी राजकारणी बनलेले नाव. व्यवसायात त्यांनी अब्जावधीची मालमत्ता जमविली हे ही खरे. ही व्यक्ती गेली म्हणून काय त्यांचे कुटुंब वाऱ्यावर पडणार नाही. सात पिढ्यांनी बसून खाल्ले तरी संपणार नाही इतकी संपत्ती त्यांनी करून ठेवली आहे.

अशा वातावरणात आलेला मृत्यू बघून त्यांच्या उर्वरित वर्षांसाठी आता सर्व पक्षांनी एकत्र येऊन त्यांची पत्नी किंवा मुलीला बिनविरोध संधी देण्याची गरज आहे. अंगडी गेले नसते तर पुढील निवडणूक येई तोवर तेच खासदार असते या गोष्टीचा विचार करून हा मोठेपणा सगळ्यांनीच दाखवला पाहिजे.पण दुर्दैवाने विरोधी पक्ष सोडाच अंगडी यांच्या भाजप मधलेच लोक ऐकत नाहीत तर काय बोलावे?
पोटनिवडणूक न करता योग्य निर्णय घेऊन अंगडी यांच्या कुटुंबातील एक व्यक्तीला संधी देऊन माणुसकी दाखवण्याची गरज आज आहे. पण हा विचार इतरांनी करण्यापूर्वी पक्षातील लोकांनी करण्याची गरज आहे. तिकिटासाठी मोर्चे बांधणी करणाऱ्यांनी आज आपल्या मानसिक कोतेपणाचे दर्शन केले आहे. त्यांनी माणुसकी आणि मोठेपणा दाखवून द्यावा अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांतून ऐकायला मिळत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.