२६ सप्टेंबर रोजी मच्छे येथे दुहेरी हत्याकांड घडल्यानंतर संपूर्ण शहर हादरले होते. या हत्याकांडामागे रचवण्यात आलेल्या कटाची ‘कल्पना’ एका सूडाच्या भावनेतून रचवण्यात आली होती, हे स्पष्ट झाले आहे. परंतु या हत्याकांडात एका निरपराध तरुणीसह एका निष्पाप अर्भकाचाही जीव गेला आहे.
अनैतिक संबंधामुळे घडलेली ही घटना शहराला हादरविणारी तर होतीच परंतु आरोपींच्या पलायनानंतर कोणताही सुगावा मिळत नसल्यामुळे पोलिसांसाठीही आव्हानात्मक होती. परंतु या प्रकरणाच्या तळाशी जाऊन अवघ्या पाच दिवसात प्रकरणाचा उलगडा करण्यात बेळगाव ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.
आधीच एक लग्न.. त्यानंतर एका महिलेशी संबंध आणि पुन्हा तिसऱ्याच महिलेशी लग्न. या दरम्यान अनैतिक संबंध असणाऱ्या महिलेकडून घेतलेली आर्थिक मदत. आणि ती मदतीची रक्कम परत न मिळाल्याने रागाच्या भावनेतून सुडाने पेट घेतलेल्या आणि आपली फसवणूक झाल्याच्या विवंचनेत असणाऱ्या महिलेने आपल्याच बहिणीच्या मुलासोबत सामील होऊन खुनाचा कट रचला. आपला प्रियकर आपल्याला परत मिळवण्यासाठी त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या पत्नीचा काटा काढला तर आपला मार्ग मोकळा या कल्पनेतून या कटाची कल्पना जिला सुचली तीच कल्पना मल्लेश बसरीमरद! आपण ज्याच्यावर विश्वास ठेवला आणि ज्याला इतकी मोठी रक्कम दिली, त्या गंगाप्पा उफ प्रशांत हुलमनीने आपल्याला फसवून दुसरीशी लग्न केले. यामध्ये कल्पनाची फसवणूक झाली असे तिला स्वतःला वाटले. याचा राग अनावर होऊन आपला नातेवाईक महेश उर्फ मल्लप्पा मोनाप्पा नाईक (वय २०, रा. सुरते, ता. चंदगड, जी. कोल्हापूर) याच्याशी संगनमत करून प्रशांतची पत्नी रोहिणी हुलमनी हिच्या खुनाचा कट रचला.
महेश उर्फ मल्लप्पा मोनाप्पा नाईक याने आपल्या इतर ३ सहकाऱ्यांची मदत घेऊन (राहुल मारुती पाटील (वय १९, रा. बेळगुंदी, ता. जी. बेळगाव), रोहित नागाप्पा वड्डर (वय २१, रा. दुर्गामाता कॉलनी, गणेशपूर), शानूर नागाप्पा बन्नार (वय १८, रा. चव्हाट गल्ली, काळ्यानट्टी) ) खुनाची पुढील दिशा ठरवली. ५ ते ६ दिवस सातत्याने रोहिणीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन असलेल्या या आरोपींपैकी एकाने रोहिणी दररोज सायंकाळी फिरायला जाते हे हेरले. आणि त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास रोहिणी घरातून बाहेर पडताच काही अंतरावर आल्यावर आरोपी राहुल आणि रोहित या दोघांनी तिच्या डोळ्यात मिरचीपूड टाकण्यात आली. आणि त्यानंतर तिच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. यादरम्यान तिची मैत्रीण राजश्री बन्नार ही तरुणीही रोहिणीसमवेत होती. रोहिणी ५ महिन्याची गरोदर होती. हा सर्व प्रकार पाहून गोंधळलेल्या राजश्रीने हल्लेखोरांना रोखण्याचा आणि रोहिणीवर होत असलेल्या हल्ल्यातून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु तिचा हा प्रयत्न फसला. आणि आरोपींना रोहिणीवर वार करताना तिने पाहिलं, याची वाचा राजश्रीने कुठे फोडू नये आणि आपण पोलिसांच्या कचाट्यात सापडू नये या भीतीपोटी त्या दोघांनी राजश्रीवरही चाकूने हल्ला केला. यादरम्यान राजश्रीचाही जीव गेला. या खुनाच्या कटात राहुल आणि रोहित या दोघांसह शानूर बन्नार आणि महेश नाईक यांचा सहभाग होता. हा एकूण घटनाक्रम पाहता त्रिकोणी प्रेमातून एका निरपराध महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.
![Machhe double murder](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/09/FB_IMG_1601212671311.jpg)
एकंदर प्रकरणात सूडाच्या भावनेने पेट घेतलेल्या कल्पनाची कल्पना फोल ठरली असून तिच्या या ‘प्लॅनिंग’ चा संपूर्ण आराखडा पोलिसांनी अवघ्या पाच दिवसात शोधून काढला. या संपूर्ण प्रकरणाकडे पाहता या हत्याकांडामागचा महत्वाचा घटक हा गंगाप्पा उर्फ प्रशांत हुलमणी हा आहे. प्रशांत भोवती फिरणाऱ्या त्याच्या उपदव्यापामुळे केवळ राजश्रीचाच नाही तर त्याची पत्नी रोहिणी आणि तिच्या गर्भात वाढणाऱ्या एका निष्पाप अर्भकाचाही जीव गेला आहे.
या प्रकरणाचा तपास घेणे पोलिसांसाठी आव्हान होते. परंतु अवघ्या पाच दिवसात या प्रकरणातील आरोपीना अटक करून पोलिसांनी उत्तम कामगिरी केली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यात ग्रामीण पोलीस स्थानकाचे पीआय सुनीलकुमार यांच्या नेतृत्वाखाली आनंद आदगोंड, बी. ए. चौगुला, बी. एस. बिचगत्ती, दीपक माळवदे, वय. वय. तळेवाड, एम. एस. गाडवी, सी. एम. हुनशाळ, एन. एम. चिप्पलकट्टी, जी. वाय. पुजारी, एस. एम. लोकुरे, सी. एस. सिंगारी या पथकाने कारवाई केली आहे.