कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर अलीकडच्या काळात मृतांची संख्या वाढली आहे. याचा गैरफायदा शहरातील सदाशिनगर आणि शहापूर येथील दोन मुख्य स्मशानभूमीच्या ठिकाणी घेतला जात आहे. याठिकाणी अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकडाच्या बाबतीत तर नागरिकांची अक्षरश लूट केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर अलीकडच्या काळात मृतांची संख्या वाढली आहे. याचा गैरफायदा शहरातील स्मशानभूमींच्या ठिकाणी घेतला जात आहे. यापैकी सदाशिवनगर आणि शहापूर येथील शहरातील प्रमुख स्मशानभूमीच्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतांच्या नातलगांची अक्षरशः लूट केली जात आहे.
सदाशिवनगर येथील स्मशानभूमीच्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या फक्त लाकडांसाठी सुमारे 3500 रुपये मोजावे लागत आहेत. याखेरीज एटीकेटसाठी 1 हजार रुपये आणि डिझेल 500 रुपये या पद्धतीने एका व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल 5 हजार रुपये खर्च येत असल्यामुळे सर्वसामान्य नागरीक विशेष करून मराठा समाजातील गरिब लोकांची अक्षरशः आर्थिक पिळवणूक होत आहे. खेदाची बाब ही की अवाच्या सव्वा पैसे उकळून जी लाकडे दिली जातात ती देखील निकृष्ट दर्जाची असतात. या लाकडांमध्ये चक्क अड्ड्यात कापलेल्या फळ्यांचे तुकडे आणि रीपा आढळून येत असल्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
सदाशिनगर स्मशानभूमीचे ही तऱ्हा तर शहापूर स्मशानभूमीमध्ये नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. याठिकाणी अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या लाकडाचा खर्च 1900 ते 2000 रुपये पर्यंत असला तरी स्मशान भूमीत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झालेली आहे. स्मशानभूमीतील मार्गावर शेवाळ साचले असल्यामुळे निसरड निर्माण झाली आहे.
परिणामी मृतदेह घेऊन जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून कसरत करत जावे लागते. त्याचप्रमाणे या ठिकाणचे कर्मचारी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांशी सहकार्याने वागण्याऐवजी उद्धट वर्तन करतात. त्यामुळे अंत्यविधीच्या कार्यात अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. तरी लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी उपरोक्त प्रकारांकडे लक्ष देऊन सदर गैरप्रकार त्वरित रोखावेत. तसेच अंत्यसंस्काराच्या लाकडाच्या बाबतीत होणारी लूट थांबवावी, अशी जोरदार मागणी होत आहेत.