बेळगाव लाईव्ह :महापालिकेच्या बांधकाम स्थायी समिती बैठकीत अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बुधवारी (दि. 8) गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पुरेसे अधिकारी उपस्थित नसल्याने बैठक चर्चेविनाच आवरती घेऊन 15 एप्रिल रोजी पुढे ढकलण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी माधवी राघोचे होत्या. मात्र, बैठकीला केवळ पाच अधिकारी आणि दहा कर्मचारी उपस्थित होते. यावर सत्ताधारी गटनेते संतोष पेडणेकर आणि नगरसेवक शाहिदखान पठाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या आठ महिन्यांत केवळ चार बैठका झाल्या असून त्यामध्येही अधिकाऱ्यांची उपस्थिती अपुरी असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
कौन्सिल सेक्रेटरी डॉ. सिद्धू हुल्लोळी यांनी काही अधिकारी बंगळूर येथे बैठकीसाठी गेले असून काही जण गणनेच्या कामात व्यस्त असल्याचे स्पष्ट केले. मात्र, नियोजनाचा अभाव का आहे आणि अधिकारी उपलब्ध असताना बैठक का घेतली जात नाही, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. भविष्यात अशा प्रकाराला सहन केले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
दरम्यान, पथदीप दुरुस्ती, पेव्हर्स बसविणे, स्मशानभूमी सुधारणा यांसारख्या विषयांना कोणतीही चर्चा न करता मंजुरी देण्यात आली. शेवटी बैठक स्थगित करून पुढील बैठक 15 एप्रिल रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी श्रेयस नाकाडी, राजू भातकांडे, भीमराव जिंगराळकर, प्रविणकुमार खिलारे आदी उपस्थित होते.





