बेळगाव लाईव्ह : नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जन्म-मृत्यू दाखल्यांच्या विभागात १ एप्रिलपासून स्वतंत्र ‘हेल्प डेस्क’ (मदत केंद्र) सुरू करण्यात आले असून, यामुळे आता दाखल्यांसाठी होणारी पायपीट थांबण्यास मदत होणार आहे.
महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या या हेल्प डेस्कमुळे अर्जांच्या छाननीची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. नवीन नोंदणी असो वा दुरुस्ती, सर्व अर्ज प्रथम या हेल्प डेस्कवर तपासले जातील.
अर्ज अपूर्ण असल्यास किंवा कागदपत्रांमध्ये काही चूक असल्यास, हेल्प डेस्कवरील कर्मचारी तात्काळ त्याची कल्पना देतील. यामुळे अर्जदारांना त्याच ठिकाणी त्रुटी दुरुस्त करण्याची संधी मिळेल. केवळ पूर्ण आणि अचूक असलेले अर्जच पुढील कार्यवाहीसाठी विभागाकडे पाठवले जातील. यामुळे प्रलंबित अर्जांची संख्या कमी होईल.
अनेकदा नागरिकांना एका लहानशा चुकीसाठी वारंवार महानगरपालिकेच्या फेऱ्या माराव्या लागत असत. मात्र, आता हेल्प डेस्कवरच प्राथमिक तपासणी होणार असल्याने नागरिकांचा वेळ वाचणार आहे. ही संकल्पना पर्यावरण अभियंता आणि विभाग प्रमुख अशोककुमार सज्जन यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे.

या उपक्रमामुळे केवळ नागरिकांनाच फायदा होणार नाही, तर विभागावरील कामाचा ताणही कमी होणार आहे. अर्जांमध्ये पारदर्शकता येईल आणि दाखले मिळण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होईल, असा विश्वास महानगरपालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.





