बेळगाव लाईव्ह: सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आणि सीमाभागातील मराठी भाषेचा आवाज बुलंद करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मराठी सन्मान यात्रेची पहिली जाहीर सभा रविवारी (१५ मार्च) सायंकाळी ७.३० वाजता येळ्ळूर येथील महाराष्ट्र चौकात होणार आहे. या सभेत अभिनेते, लेखक आणि शिवसैनिक नंदकुमार गोरूले हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
गोरूले यांच्या भारदस्त आवाज आणि अभ्यासपूर्ण मांडणीमुळे ते श्रोत्यांना खिळवून ठेवतात. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे सीमाभागातील मराठी बांधवांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, दुपारी ४ वाजता राजहंसगड येथून मराठी सन्मान यात्रेला प्रारंभ होणार आहे. ही यात्रा सुळगे (येळ्ळूर), अवचारहट्टी, देवगण हट्टी, मांसगौंड हट्टी, ब्रम्हदेव हट्टी आणि धामणे या मार्गे मोटरसायकल रॅलीच्या स्वरूपात पुन्हा येळ्ळूर येथे पोहोचेल. त्यानंतर महाराष्ट्र चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते व माजी एपीएमसी सदस्य वामनराव पाटील राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, तसेच तालुका समितीचे अॅड. एम. जी. पाटील उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, तसेच विविध गावांतील समितीचे पदाधिकारी आणि ग्रामपंचायत प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
मराठी भाषा व संस्कृतीच्या सन्मानासाठी आयोजित या यात्रेत सीमाभागातील मराठी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होऊन लढा यशस्वी करावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.





