बेळगाव लाईव्ह : एकेकाळी देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बेळगाव स्मार्ट सिटीच्या ‘सिटीज २.०’ प्रकल्पाला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे आणि तांत्रिक चुकीच्या निर्णयामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता बंद पडण्याच्या मार्गावर असून, याविरोधात मंजुनाथ बनशंकरी यांनी एल्गार पुकारला आहे.
आज बेळगावमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मंजुनाथ बनशंकरी यांनी प्रशासकीय अनास्थेचा पाढाच वाचला. एकेकाळी बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ‘विश्वास’ (VIISWAS) प्रकल्प आज अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे धुळीला मिळाला आहे. बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडमध्ये (BSCL) पात्र ताज्ज्ञांऐवजी केवळ राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तींची नेमणूक झाल्याने प्रकल्पाची वाट लागली आहे, अशी जळजळीत टीका मंजुनाथ बनशंकरी यांनी केली.
विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी मंजूर झालेला १३५ कोटींचा निधी केवळ ७५ कोटींवर आला आहे. याला तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांचे चुकीचे निर्णय जबाबदार असल्याचे त्यांनी उघड केले.

सध्याच्या व्यवस्थापकीय संचालिका कविता एम. वारंगल यांच्या काळात तर कचरा व्यवस्थापन अहवालात बनावट प्रमाणपत्रे वापरून लाखो रुपयांचा चुराडा झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
हा संपूर्ण गोंधळ आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला असून, प्रकल्पावर स्थगिती येण्याची टांगती तलवार आहे. अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे बेळगावच्या विकासाला खीळ बसत आहे. त्यामुळे, तातडीने सध्याच्या व्यवस्थापकीय संचालिकांची गच्छंती करून तिथे कार्यक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अन्यथा ३ एप्रिलपासून तीव्र उपोषण छेडण्याचा इशारा मंजुनाथ बनशंकरी यांनी नगरविकास विभागाला दिला आहे.





