बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या प्रशासकीय अक्षमतेमुळे महत्त्वाकांक्षी ‘सिटीज २.०’ प्रकल्पाला मोठा फटका बसला आहे. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी आता स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांवर खापर फोडले जात असून, हा प्रकार जनतेची दिशाभूल करणारा असल्याचे राजकुमार टोपन्नावर यांनी म्हटले आहे.
या संदर्भात प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करून राजकुमार टोपन्नावर यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. स्मार्ट सिटी कंपनीने मे २०२५ मध्येच महानगरपालिकेकडे प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या २० टक्के स्वनिधीच्या मंजुरीची मागणी केली होती. त्यानंतर स्मरणपत्रे देऊनही महानगरपालिका प्रशासनाने यावर कोणताही निर्णय घेतला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
महानगरपालिकेने अद्याप आपला आर्थिक हिस्सा जमा केलेला नाही आणि प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जागाही अंतिम केलेली नाही. तांत्रिकदृष्ट्या, जोपर्यंत निधी आणि जागेचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत स्मार्ट सिटी प्रशासन पूर्ण प्रस्ताव सादर करू शकत नाही. ही वस्तुस्थिती असतानाही भाजप सत्ताधारी जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांना लक्ष्य करत असल्याचे राजकुमार टोपन्नावर यांनी पत्रात नमूद केले आहे.
या वादात भर म्हणून भाजपच्या ‘महा मार्गदर्शकांनी’ विधानसभेत एल अँड टी कंपनीवर टीका केली. हा केवळ दक्षिण बेळगावमधील नागरिकांचे लक्ष मूळ प्रश्नावरून भरकटवण्याचा प्रयत्न आहे. महानगरपालिकेच्या या आडमुठ्या धोरणामुळे बेळगाव शहर एका मोठ्या परिवर्तनाच्या संधीला मुकण्याची भीती निर्माण झाली आहे, असेही राजकुमार टोपन्नावर यांनी स्पष्ट केले.
भाजपप्रणित महानगरपालिकेने तातडीने २० टक्के निधी जमा करावा, जागेचे वाटप पूर्ण करावे आणि स्मार्ट सिटीशी समन्वय साधून प्रस्ताव सादर करावा. बेळगावच्या जनतेला दिशाभूल करणारे राजकारण नको, तर विकास हवा आहे, अशी आग्रही मागणी राजकुमार टोपन्नावर यांनी केली आहे.





