बेळगाव लाईव्ह : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत नेहमीच सक्रिय भूमिका बजावणाऱ्या पत्रकारांनी आता पुन्हा एकदा सीमाप्रश्नासाठी पुढाकार घेतला आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या सुनावणीला गती मिळावी, यासाठी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भातील दावा (क्रमांक ४/२००४) दि. २९ मार्च २००४ रोजी राज्यघटनेच्या अनुच्छेद १३१ (ब) अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता. मात्र, तब्बल २२ वर्षे उलटूनही या खटल्याची सलग सुनावणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने व जलदगतीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीने सरन्यायाधीशांकडे करण्यात येणार आहे.
यासाठी सीमा भागातील मराठी भाषिकांकडून एक लाख सह्यांचे निवेदन गोळा करून ते सादर करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या व्यापक मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी रविवार, दि. २९ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता खानापूर रोडवरील मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिजजवळ) येथे मराठी भाषिकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात येणार असून, मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर व कार्यकारिणीने केले आहे.





