बेळगाव लाईव्ह -“या देशात छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्यावेळी भारताची परिस्थिती अतिशय कठीण होती धर्मविरोधी, शास्त्रविरोधी, नीतिविरोधी काम करणारे अनेक लोक असताना शिवराय जन्माला आले. राजा कसा असावा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून शिकता येते. ते होऊन गेले त्याला साडेतीनशे वर्षे झाली पण आजही त्यांचे जीवन प्रेरणादायी आहे. अशा या निष्कलंक चारित्राच्या राजाच्या जीवनावर ही पुस्तके प्रकाशित करून विक्रम साप्ताहिकाने अतिशय चांगले काम केले आहे”असे विचार बेंगलोरच्या गोसाई महासंस्थान मठाचे जगद्गुरु वेदांताचार्य प पू मंजुनाथ भारती महास्वामीजी यांनी बोलताना व्यक्त केले.
मंगलोरच्या ज्ञानभारती ट्रस्ट च्या वतीने शिवाजी महाराजांच्या जीवनावरील छत्रपती सह्यकेसरी हे मराठीतून आणि शकावतार हे कन्नड मधून पुस्तक प्रकाशित करण्याचा कार्यक्रम शनिवारी रात्री केएलईच्या डॉ बीएस जिरगे भवनात संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंजुनाथ भारती महास्वामीजी उपस्थित होते .
मंजुनाथ भारती स्वामीजी पुढे म्हणाले की,” छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आजवर हजारो पुस्तके लिहिली गेली पण तरीही प्रत्येक नवीन पुस्तकामुळे त्यांच्या जीवनातील अनेक नवीन पैलू समजतात. महाराज देशासाठी, धर्मासाठी आणि परोपकारासाठी लढले. त्यांनी युद्ध शास्त्रात केलेले संशोधन, परस्त्री बद्दल त्यांनी व्यक्त केलेले विचार हे सर्व अभूतपूर्व होते ” असेही ते म्हणाले.
कार्यक्रमास मुख्य वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या आरएसएसचे अखिल भारतीय सहव्यवस्थाप्रमुख अनिल ओक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.” छत्रपती शिवरायांचे प्रशासनातील कौशल्य अनन्यसाधारण होते .स्वराज्याचे स्वराज्यात रुपांतर करण्यासाठी त्यांच्या या प्रशासकीय कौशल्याचा उपयोग झाला. शिवाजी महाराजांनी फक्त सात वर्षे युद्धासाठी खर्च केली तर बाकीची 28 वर्षे प्रशासकीय कामासाठी खर्च केली” असे सांगून “शिवाजी महाराजांची युद्धनीती, अर्थनीती आणि अर्थकारण हे अतिशय उच्च दर्जाचे होते.
त्यांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते” असे सांगून केवळ भारतातच नव्हे तर जगभरात शिवाजी महाराजांना किती मान आहे व होता हे त्यांनी विशद केले.

व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आरएसएसचे प्रांत कार्यकारणी सदस्य अरविंदराव देशपांडे यांनी पुस्तकांच्या निर्मिती मागील उद्देश स्पष्ट केला तर विक्रम साप्ताहिकाचे संपादक रमेश दोड्डापूर यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. ज्ञानभारती प्रकाशनाचे संचालक दुगु लक्ष्मण यांनी या दोन्ही पुस्तकांची माहिती देत त्यातील वैशिष्ट्ये उलगडून दाखवली.
प्रारंभी महिलांनी भरतनाट्य आणि स्वागत गीत सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील लघुपटही दाखवण्यात आला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे आणि आरएसएस चे अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख मंगेश भेंडे हेही उपस्थित होते.
कार्यक्रमा चे सूत्रसंचालन मानसि गोखले यांनी केले तर विठ्ठलदास कामत यांनी आभार मानले. कार्यक्रमास अनेक मान्यवर आणि निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.





