बेळगाव लाईव्ह : रंगपंचमीच्या दिवशी खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी घाट परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. गर्लगुंजी येथील २४ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली असून सणाच्या आनंदावर विरजण पडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गर्लगुंजी येथील विशाल सातेरी बिर्जे (वय २४) हा रंगपंचमी निमित्त आपल्या काही मित्रांसह पार्टी करण्यासाठी खानापूरजवळील मलप्रभा नदी घाट परिसरात गेला होता. सणाचा आनंद साजरा करत असताना संतोष पोहण्यासाठी नदीच्या पाण्यात उतरला. मात्र काही मिनिटांतच तो पाण्यात दिसेनासा झाला.
सुमारे पाच मिनिटे उलटूनही विशाल वर आला नाही हे लक्षात येताच त्याच्या मित्रांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी तातडीने गावातील नागरिकांना माहिती दिली. यानंतर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रसाद पाटील यांनी पोलिस व अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मलप्रभा नदीच्या पात्रात शोधमोहीम सुरू करण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या प्रयत्नांनंतर संतोषचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
दरम्यान, विशाल बिर्जे हा मशरूम शेतीचा व्यवसाय करीत होता. तो गर्लगुंजी येथील पीकेपीएस सोसायटीचे सेक्रेटरी सातेरी बिर्जे यांचा मुलगा असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे गर्लगुंजी गावात शोककळा पसरली असून रंगपंचमीच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे सणाचा उत्साह मावळल्याचे चित्र दिसून येत आहे.





